झिम्बाब्वेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने 100 धावांनी विजय मिळवला. या सामन्याध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्सप्रमाणे प्रदर्शन केलं. कारण टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतरच्या पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेकडून मानहानिकारक पराभव झाली. युवा टीम इंडिया ट्रोल झाली. दुसऱ्या सामन्यात जखमी वाघासारखे झिम्बाब्वेवर टीम इंडियाचे खेळाडू तुटून पडले. या मालिकेमधून पदार्पण करणारा युवा खेळाडू अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची कातडी काढली. पठ्ठ्याने सर्वात वेगवान शतक करण्याच्या यादीत जागा मिळवली. आयपीएलमध्येही त्याने अशा अनेक आक्रमक खेळी केल्या आहेत. मात्र हाच अभिषेक पहिल्या सामन्यात शून्यावर आऊट झाल्यावर त्याच्यावर टीका होत होती. पण कोच लक्ष्मणने त्याला एकच गोष्ट सांगितली आणि दुसऱ्या मॅचमध्ये शतकी खेळी केली.
पहिल्या टी-20 मध्ये फेल गेल्यावर अभिषेकने कर्णधार शुबमन गिल आणि कोच लक्ष्मण यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी लक्ष्मणने सांगितलं की, आयपीएलमध्ये तू आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना फोडून काढत होतास. त्यामुळे हा सामनाही आयपीएलसारखा आहे असं समज आणि खेळ. तु तुझा मैदानात वेळ घे परिस्थितीशी जुळवून घे त्यानंतर तुला कोणीच थांबवू शकणार नाही, असं अभिषेक शर्मा याचे वडील राजकुमार शर्मा यांनी सांगितलं.
शुबमन गिल आणि अभिषेक हे पंजाबकडून अंडर 14 मध्ये ओपनिंगला खेळले होते. आता दोघे परत एकदा ओपनिंगला येता आहेत. दोघे आक्रमक ओपनिंग देऊ शकतात आणि टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून देतील, असंही राजकुमार शर्मा म्हणाले.
अभिषेक शर्माने 47 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले होते. सोशल मीडियावर रोहित शर्मा गेल्यावर त्याची जागी युवा अभिषेक शर्माने घतल्याचं चाहते कमेंटमध्ये बोलत आहेत. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेडसोबत फलंदाजीला येणारा अभिषेक टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज होऊ शकतो. त्यासोबतच तो बॉलिंगही टाकतो त्यामुळे कॅप्टनला वेळ पडली तर त्याचा पर्यायही खुला असणार आहे.