अजिंक्य रहाणेचं क्रिकेट करिअर खराब करण्यास कोण जबाबदार? हरभजन सिंगने सांगितली ‘मन की बात’

| Updated on: Oct 28, 2024 | 5:47 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे याला स्थान मिळणं कठीण झालं आहे. अजिंक्य रहाणे काउंटी क्रिकेटनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नशिब पारखतोय. एक काळ भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेवर अशी वेळ का आली? याबाबत हरभजन सिंगने आपलं मत व्यक्त केलं आहे.

अजिंक्य रहाणेचं क्रिकेट करिअर खराब करण्यास कोण जबाबदार? हरभजन सिंगने सांगितली मन की बात
Follow us on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना केवळ औपचारिक असणार आहे. दरम्यान, दोन कसोटी सामन्यातील पराभव पाहता भारतीय संघाचा एक कमकुवतपणा अधोरेखित झाला आहे. बंगळुरुच्या वेगवान गोलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघ 46 धावांवर बाद झाला. तर पुण्याच्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर मिचेल सँटनरने भारतीय खेळाडूंना गुंतवलं. भारतीय संघाने गेल्या 12 वर्षांपासून देशात एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. मात्र आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. मागच्या 12 वर्षांचा इतिहास पाहिला तर भारताला फिरकीपटूंच्या जोरावरच विजय मिळाला होता. पण या मालिकेत भारतीय फलंदाजही फिरकीचा सामना करताना अकार्यक्षम दिसले. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पराभव झाल्यानंतर हरभजन सिंगने व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे.

हरभजन सिंगने सांगितलं की, ‘भारतीय फलंदाजांनी अशा विकेटवर खेळून आपला आत्मविश्वास गमावला आहे. अजिंक्य रहाणेचं करिअर असंच प्रभावित झालं होतं. मागच्या दशकांचा विचार केला तर आम्ही एक दशकाहून अधिक काळ टर्नर खेळपट्टीवर खेळत आहोत. टॉस जिंकून आम्ही 300 धावा करू आणि खेळ आपल्या नियंत्रणात राहील. असं सर्व आपल्या खेळाडूंकडे फिरकी खेळण्याची क्षमता आहे की नाही याचा विचार न करता केलं आहे. आम्ही पराभवाच्या वेशीवर असताना आम्ही फिरकी पिच तयार करण्यावर जोर देत आहोत. खरं तर या खेळपट्टीवर खेळण्याचा आत्मविश्वास आमच्या खेळाडूंनी गमावला आहे.’

“अजिंक्य रहाणे याचं उत्तम उदाहरण आहे. अजिंक्य राहणे एक उत्तम फलंदाज आहे. अशा पद्धतीच्या खेळपट्टीमुळे त्याचा खेळावर परिणाम झाला. आपण कायम SENA देश त्यांच्या हिशेबाने खेळपट्ट्या तयार करतात यावर जोर देतो. पण फलंदाजी करू शकत नाही अशा खेळपट्ट्या नाही करत. वेळेनुसार खेळपट्ट्यांमध्ये बदल होतो. जर आम्हाला माहितीच नसेल कोणती खेळपट्टी टर्न घेते. तर बचावात्मक खेळायचं की आक्रमक याबाबत अंदाज येणार नाही. विराट कोहली विदेशात चांगलं खेळतो. कारण तिथे चेंडू बॅटवर येतो.”, असं हरभजन सिंगने सांगितलं.

अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळाडू खेळाडूंचा आत्मविश्वास कमी होतो. पण निवडकर्ते तुम्ही एक चांगले खेळाडू आहात म्हणून विदेश दौऱ्यासाठी निवड करतात. पण धावा होत नसल्याने विदेश दौऱ्यावर मानसिक परिणाम होतो, त्याचा परिणाम खेळावर दिसतो, असंही हरभजन सिंगने सांगितलं.