विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं की…

| Updated on: Jul 22, 2024 | 2:10 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं आणि पुन्हा एकदा आशा वाढल्या. त्यामुळे येणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं की...
Follow us on

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची निवड झाल्यानंतर बरीच उलथापालथ झाली आहे. संघ निवडीपासून कोण कोणत्या फॉर्मेटमध्ये खेळणार याबाबत खलबतं झाली. इतकंच काय तर 2026 टी20 वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्व सोपवलं गेलं. 2026 हा वर्ल्डकप भारतात होणार असल्याने त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. दुसरीकडे, वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 हे दोन लक्ष्य रोहित शर्माच्या नेतृत्वात गाठायचा मानस आहे. गौतम गंभीरचं प्रशिक्षकपद आणि रोहित शर्माचं नेतृत्व हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या दोन स्पर्धांमध्ये टीम इंडियाच्या पदरी यश पडलं तर पुढे बरंच काही घडणार आहे. कारण 2025 नंतर दोन वर्षांनी 2027 हे वर्ष असणार आहे. या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली भाग घेणार का? हा प्रश्न आहे. कारण रोहित शर्माचं वय 40 तर विराटचं वय 39 वर्षे असणार आहे. असं असताना गौतम गंभीरने या दोघांबाबत आपलं मत स्पष्ट केलं आहे.

“मोठ्या स्पर्धेत ते काय देऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मग तो टी20 वर्ल्डकप असो की, वनडे वर्ल्डकप..मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, या दोघांकडे भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नोव्हेंबर 2024 ऑस्ट्रेलिया दौरा खूप महत्त्वाचा आहे. यातून हे दोघंही नक्कीच चांगली प्रेरणा देतील. जर त्यांनी आपलं फिटनेस व्यवस्थित ठेवलं तर नक्कीच ते 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही खेळतील.”, असं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितलं.

“हा एक वैयक्तिक निर्णय आहे. आता त्यांच्यात किती क्रिकेट शिल्लक आहे हे मी सांगू शकत नाही. शेवटी ते त्यांच्यावर अवलंबून आहे. संघाच्या यशात किती योगदान देतात हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. कारण शेवटी संघ महत्त्वाचा आहे. विराट आणि रोहितकडे पाहता त्यांच्याकडे बरंच क्रिकेट शिल्लक आहे. सहाजिकच कोणत्याही संघाला हे दोघं हवे आहेत. जितकं शक्य तितकं त्यांनी संघासोबत असावं अशीच इच्छा आहे.”, असंही गौतम गंभीर याने पुढे सांगितलं.

गौतम गंभीरने वरिष्ठ खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबतही आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. “वर्कलोड व्यवस्थापन गरजेचं आहे. पण ते बुमराहसारख्या खेळाडूसाठी योग्य ठरेल. कारण तो अपवादा‍त्मक आणि दुर्मिळ क्षमता असलेला खेळाडू आहे. पण फलंदाजांचा विचार करता त्यांनी खेळत राहायला हवं. स्पर्धांसाठी उपलब्ध राहायला हवं. रोहित आणि विराट आता अधिक खेळू शकतात कारण त्यांनी टी20 मधून निवृत्ती घेतली आहे.”, असंही गौतम गंभीर पुढे म्हणाला.