साऱ्या भारतीयांसाठी एक वाईट आणि तेवढीच संतापजनक बातमी समोर आली आहे. मॅच रेफरीच्या वादग्रस्त निर्णयामुळे फुटबॉल टीम इंडिया 2026 च्या फीफा वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडली आहे. टीम इंडियाला 11 जून रोजी कतारकडून 2-1 च्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. या सामन्याचं आयोजन हे दोहा येथे करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या या पराभवासह असंख्य भारतीय आणि फुटबॉल प्रेमींचं स्वप्नभंग झालं आहे. मॅच रेफरीने दिलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियावार वादाला तोंड फुटलं आहे. फुटबॉल चाहत्यांनी या निर्णयाविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
लालियनजुयाला छांगटे याने केलेल्या गोलमुळे टीम इंडिया आघाडीवर होती. मात्र मॅच रेफरीने दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. तर हा निर्णय कतारच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर कतारने दुसरा गोल करत सामना जिंकला. टीम इंडियाकडून लालियनजुयाला छांगटे याने 37 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली होती. तर कतारसाठी यूसुफ अयमन आणि अहमद अल रावी या दोघांनी गोल केला.
वादग्रस्त निर्णयाचा टीम इंडियाला फटका
Shame on Qatar and shame on Refrees.
Qatar blatantly cheated to defeat India 2-1 in World Cup qualifiers.
The ball clearly crossed the line, Qatar player pulled the ball back and referee calls It Goal.pic.twitter.com/TaYSJdsUhZ
— Ankur Singh (@iAnkurSingh) June 11, 2024
मॅच रेफरीने दिलेला वाद हा कतरच्या पहिल्या गोलबाबत आहे. मॅच रेफरीने कतरच्या बाजूने निर्णय देत टीम इंडियावर उघड उघड अन्याय केल्याचं, व्हायरल व्हीडिओतून पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हीडिओत फुटबॉल गोलपोस्टच्या बाहेर गेलेला दिसत आहे. कतरच्या खेळाडूंनी बॉल लाईनच्या बाहेर गेलेला असूनही आत ढकलला आणि गोलपोस्टमध्ये मारला. यूसुफ अयमन याने हा गोल केला. टीम इंडियाने यावरुन आक्षेप घेतला मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे कतारने सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे सोशल मीडियावर फुटबॉल समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मॅच रेफरीने दिलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे टीम इंडियाने आपली लय गमावली. त्याचा फायदा हा कतारने घेतला. कतारचा अहमद अली रावी याने 85 व्या मिनिटाला दुसरा गोल केला आणि सामना खिशात घातला.