APY : निवृत्तीनंतर नसेल पैशांची चिंता! केवळ 210 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळेल इतकी पेन्शन

| Updated on: Aug 20, 2023 | 4:43 PM

APY : अटल पेन्शन योजनेत लाभार्थ्यांना दर महा 5,000 रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते. ही योजना केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. काय आहे ही योजना, कसा होतो फायदा?

APY : निवृत्तीनंतर नसेल पैशांची चिंता! केवळ 210 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळेल इतकी पेन्शन
Follow us on

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारने देशातील प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. कोट्यवधी निवृत्तीधारकांची आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) आणली आहे. 2015 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत लाभार्थ्यांना दरमहा एक निश्चित गुंतवणूक केल्यावर वार्षिक 60,000 रुपयांची पेन्शन मिळते. म्हणजे प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळते. त्यामुळे औषधांचा खर्च व इतर खर्चाची तरतूद होते. या योजनेसाठी दरमहा गुंतवणूक करणे आवश्यक आहे. काय आहे या योजनेची सविस्तर माहिती आणि पात्रता..

काय आहे अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना खासकरुन गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. 18 ते 40 वर्षातील लोकांसाठी ही योजना आहे. जे लोक करदाते नाहीत, कराच्या परिघात ज्यांचे उत्पन्न येत नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. अटल पेन्शन योजना (APY), भारतीय नागरिकांसाठी, असंघटित क्षेत्रातील कामगार, कष्टकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आहे. या योजनेतंर्गत 60 व्या वर्षी लाभार्थ्यांना 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये वा 5000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची हमी मिळते. सध्या योजनेत एकूण 5 कोटींहून अधिक लाभार्थी आहेत.

हे सुद्धा वाचा

कुठे उघडता येईल खाते

पूर्वी असंघटित कामगारांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. लोकप्रियता पाहता केंद्र सरकारने 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतच्या सर्व लोकांसाठी ही योजना खुली केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडता येते.

किती करावी लागते गुंतवणूक

  1. 18 व्या वर्षी 42 रुपये प्रति महिना गुंतवणूक केली तर 60 व्या वर्षी 1,000 रुपये पेन्शन मिळेल
  2. 2,000 रुपयांची निवृत्ती रक्कम मिळविण्यासाठी 42 रुपये प्रति महिना गुंतवावा लागेल.
  3. 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी 126 रुपयांची गुंतवणूक द्यावी लागेल.
  4. दरमहा 168 रुपये गुंतविल्यास लाभार्थ्याला 4000 रुपये पेन्शन मिळेल.
  5. 210 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीवर 5000 रुपये निवृत्ती रक्कम मिळेल.

60 वर्षांपूर्वीच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास

लाभार्थी 60 वर्षांपूर्वी मयत झाला तर त्याच्या साथीदाराला, वारसाला पेन्शन मिळते. जोडीदाराचा पण मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदारांना एकरक्कमी लाभ मिळतो.  या योजनेत खाते उघडतानाच वारसाची नोंदणी करणे फायदेशीर ठरते. लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना पेन्शन मिळते.

दर महिन्याला खात्यात रक्कम

या योजनेत गुंतवणूकदाराला दरमहा 1000 ते 5000 रुपयांचा लाभ मिळतो. केंद्र सरकारने दर महिन्याला लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत करते. अटल पेन्शन योजनेसाठी तुम्हाला अगोदर रितसर नोंदणी करावी लागते. नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. योजनेतंर्गत लाभार्थ्याला दरमहा एक ठराविक रक्कम त्याच्या खात्यात मिळते.