मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी बेछूट गोळीबार केल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातचे राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेत महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार होत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांनी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे आता ही गुन्हेगारी कमी करणे ही सरकारची खरी परीक्षा असेल अशी टीका केली आहे. राज्यातील सरकार कसे चालले आहे हे दाखविणारे ही घटना असून अत्यंत गंभीर आहे. करणारे जे आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते कुणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला माहीती आहे. राजकीय अभिनिवेश, राजकीय मानसिकता किती बळावलेली आहे की आपण काहीही करु शकतो. आमदार असले तरी आपण पोलिस ठाण्यात जाऊन पाच राऊंड फायर करेपर्यंत काही त्याला होत नाही. असे उत्तर प्रदेश-बिहारमध्ये होत असेल महाराष्ट्रात असे कधीच झालेले नाही ते आज झालेले आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.