पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताना पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच दिवशी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता नरेंद्र मोदी 2 सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी दोन, दोन हजार रुपये दिले जातात. तसेच केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे. राज्य सरकारकडूनही सहा हजार रुपये दिले जातात. यामुळे केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला बारा हजार रुपये जमा होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सूत्र स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे. त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या विकास आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत.
यापूर्वी पीएम शेतकरी सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 हप्ता 28 फेब्रुवारी रोजी आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाती आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे. तसेच बँकेत केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in वर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जारी झाला की नाही? हे तपासून घेऊन शकतात. तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास हेल्पलाइन (1800-115-5525) वर संपर्क करु शकतात.