भारताला सेमीकंडक्टर हब करण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली जात आहे. उद्योगपती रतन टाटा यांनी आसाममध्ये सेमीकंडक्टर प्लॅन्ट सुरु केला. त्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी टाटांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्लॅन्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला. अदानी समूहाकडून 83 हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात सुरु केला जाणार आहे. महाराष्ट्रातील या प्रकल्पासाठी अदानी समुहाला इस्त्रायलची मदत मिळणार आहे. यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात आतापर्यंत वर्चस्व असलेल्या चीनची झोप उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला मोबाइल हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोदी सरकारने सेमीकंडक्टर पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह) स्कीम सुरु केली आहे. देशात बनलेली पहिली सेमीकंडक्टर चिप 2025 च्या मध्यापर्यंत येणार आहे. चीनच्या नाकावर टिच्चून सरळ त्यांच्या सीमेजवळ 27,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपने आसाममध्ये सुरु केले आहे. या प्रकल्पातून रोज 4.83 कोटी चिप तयार होणार आहेत. यामुळे चीनचा दबदबा मोडला जाणार आहे. टाटा नंतर अदानी समूहाने या क्षेत्रात पाऊल ठेवले. अदानी समुहाने टाटा समुहापेक्षा मोठा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. 83 हजार कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. यामुळे चीनची सेमीकंडक्टरमधील मक्तेदारी संपणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कायन्स टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडचा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पात रोज 60 लाख सेमीकंडक्टर चिप बनवण्यात येणार आहे. हा प्रकल्प गुजरातमधील साणंदमध्ये होणार आहे. 3300 कोटी रुपयांची गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे.
सेमीकंडक्टर म्हणजेच सिलिकॉन चिप प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनात वापरली जातो. परंतु सेमीकंडक्टरची निर्मिती आतापर्यंत भारतात होत नव्हती. भारत सेमीकंडक्टर आयात करत होता. जगभरात या क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे. सेमीकंडक्टर चिप शिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवता येत नाही. अगदी एलईडी बल्बपासून, कार, मोबाइलपर्यंत, टीव्ही, संगणक, लॅपटॉप, क्षेपणास्त्रांपर्यंत सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. सेमीकंडक्टरची चिप इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील मेमरी ऑपरेट करण्याचे काम करते.