Kalyan Crime News : मुंबई उपनगर रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अनेक वेळा वाद होत असतात. तसेच रेल्वेच्या तिकीट काउंटरवरील खिडकीत असलेल्या रेल्वे क्लार्कशी काही जण वाद घालत असतात. परंतु वादामुळे एखाद्या रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यास मारहाण करण्याची मजल प्रवाशांची झाली आहे. कल्याणमधील रेल्वे स्थानकावर सुट्या पैशांवरुन काही प्रवाशांनी वाद घातला. त्या वादानंतर प्रवाशांनी महिला कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. त्यामुळे त्या महिला कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचा धक्कादायक राग दिसून आला. कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. उपनगर रेल्वेचे तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरुन वाद झाला. या वादात प्रवाशांनी तिकीट बुकिंग क्लार्क रोशना पाटील यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत रोशना पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपीने मारहाण करणाऱ्या आन्स्सर शेख याच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी गोंधळ घातल्याची माहिती जीआरपी पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी काही फेरीवाले त्या ठिकाणी गोंधळ घालत होते. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेचे तिकीट क्लार्क अश्विनी शिंदे यांनी या प्रकारानंतर पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.