नागपुरात अजब प्रकार, पावसाचं पाणी घरात शिरल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण

| Updated on: Jun 18, 2024 | 3:43 PM

नागपुरात एक अजब प्रकार समोर आला आहे. पावसाचं पाणी घरात शिरल्याने नागरिकांनी थेट भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण केली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

नागपुरात अजब प्रकार, पावसाचं पाणी घरात शिरल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण
Follow us on

राज्यात आता सर्वदूर पाऊस पडणार आहे. कारण आता पावसाळा सुरु झालाय. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी पाऊस हा वाट बघायला लावतोय. सर्वत्र सध्या पावसामुळे आनंदाचं वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. पेरणीसाठी चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. काही शहरांमध्ये पाऊस पडल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय. तर काही ठिकाणी चांगला पाऊस पडल्यामुळे पाणी साचायला आतापासूनच सुरुवात झाली आहे. अर्थात या गोष्टींवर प्रशासनाच्या मदतीने मार्ग काढता येऊ शकतो. प्रशासनाने त्यावर उपाययोजना करणे देखील अपेक्षित आहे. पण पाणी साचल्यामुळे हिंसक होणं योग्य नाही. अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. याउलट कायदेशीरपणे आपण आपली भूमिका मांडू शकतो आणि न्याय मिळवून घेऊ शकतो. पण नागपुरातील संतप्त नागरिकांनी टोकाचा निर्णय घेत थेट भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नागपुरात पाऊस पडल्यामुळे एका परिसरात पावसाचं पाणी घरात शिरलं. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अतिशय चुकीचं आणि टोकाचं कृत्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या कृत्याचं समर्थन करता येणार नाही. या नागरिकांनी वेगळा काही कायदेशीर मार्ग अवलंबणं अपेक्षित होतं. पण त्यांनी कोणताही कायदेशीर मार्ग न अवलंबता पावसाचं पाणी घरात शिरल्यानं माजी नगरसेवकाला मारहाण केली. नागरिकांकडून भाजपचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण करण्यात आली आहे. जुना सुभेदार भागात रोडचं काम सुरु असताना पावसाचं पाणी घरात शिरलं, यामुळे हा प्रकार घडला.

नगरसेवक नेमकं काय म्हणाला?

या मारहाणीत माजी नगरसेवक दीपक चौधरी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्यासोबत काय घडलं? याबाबतची प्रतिक्रिया दिली. “एक व्यक्ती धावत आला. मी माझ्या घराच्या मागच्या लायनीत होतो. तिथे धावत आला. तो मागून मला दगड मारुन गेला. त्यामुळे रक्त वाहू लागलं. डोळ्यांमध्ये रक्त येत होतं त्यामुळे मला काही दिसतच नव्हतं. मग कुणी टीशर्ट धरुन असंच… पूर्ण वस्ती जमा झाली. मग ते तिथून पळून गेले. मी या प्रकरणी पोलीस तक्रार केली आहे. कारण पाण्यामुळेच झालेला हा विषय आहे”, अशी प्रतिक्रिया दीपक चौधरी यांनी दिली.