सर्वात मोठी कारवाई, महाराष्ट्र शासनातील तीन लाचखोर शिक्षण अधिकाऱ्यांना जोराचा झटका

| Updated on: Dec 06, 2023 | 9:45 PM

एसीबीने मोठी कारवाई केली आहे. काही अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. त्यांच्याबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यांनी कोट्यवधींची संपत्ती गैरमार्गाने जमवल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी आता एसीबीकडून मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. एसीबीने तीन बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

सर्वात मोठी कारवाई, महाराष्ट्र शासनातील तीन लाचखोर शिक्षण अधिकाऱ्यांना जोराचा झटका
Follow us on

अभिजित पोते, Tv9 मराठी, पुणे | 6 डिसेंबर 2023 : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक अर्थात एसीबीने 3 बड्या शिक्षण अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. एसीबीने या तीनही अधिकाऱ्यांवर गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल केला आहे. टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी किरण लोहार आणि त्यांच्या कुटुंबियांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर आता सुपे यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात, लोहार यांच्यावर सोलापूरमधील सदर बाजार पोलीस ठाणे आणि कांबळे यांच्यावर सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.

कोणाकडे किती मालमत्ता?

तुकाराम सुपे यांच्यावर 3 कोटी 59 लाख रुपये, विष्णू कांबळे यांच्यावर 82 लाख 99 लाख रुपये तर किरण लोहार यांच्यावर 5 कोटी 85 लाख रुपये गैरमार्गाने जमावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एसीबीकडून काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिकाऱ्यांवर नेमके आरोप काय?

तुकाराम सुपे हे राज्य परीक्षा आयुक्त होते. सुपे यांना गेल्यावर्षी 17 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला होता. बी. एड्. आणि डी. एड्. विद्यार्थ्यांच्या शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या परीक्षेची जबाबदारी तुकाराम सुपे यांच्यावर होती. अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याची माहिती तपासातून समोर आली होती.

सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे देखील एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. या अधिकाऱ्याने काही शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रुपये लाच मागितल्याची माहिती समोर आली होती.

सोलापूर जिल्हा परिषदेतील किरण लोहार यांच्याबाबतदेखील धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यांनी एका कर्मचाऱ्याकडे लाच मागितली होती. पण एसीबीने सापळा रचून त्यांना अटक केली होती. विशेष म्हणडे किरण लोहार यांनी भ्रष्टाचार करुन कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याची चर्चा रंगली होती. आता या तीनही अधिकाऱ्यांची कसून चौकशी होणार आहे.