बीबीए, बीसीएच्या प्रवेशापासून विद्यार्थी राहणार वंचित, सीईटी परीक्षेचे…

| Updated on: Jun 13, 2024 | 4:07 PM

राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. या धोरणानुसार हे सर्व अभ्यासक्रम तंत्रशिक्षण परिषदेने आपल्या अखत्यारित घेतले आहेत. मात्र, यंदा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी चिंतेत दिसत आहेत.

बीबीए, बीसीएच्या प्रवेशापासून विद्यार्थी राहणार वंचित, सीईटी परीक्षेचे...
students
Follow us on

राज्यभर बीसीए, बीसीएस, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी यावर्षी प्रथमच सीईटी 2024 ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली. परंतू, सांगली जिल्ह्यासह राज्यभरातील बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे राज्यभरातील महाविद्यालयात बीबीए, बीसीएच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार हे स्पष्ट आहे.

राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. या धोरणानुसार हे सर्व अभ्यासक्रम तंत्रशिक्षण परिषदेने आपल्या अखत्यारित घेतले आहेत. पूर्वी हे अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर चालायचे. परिषदेकडे अभ्यासक्रम गेल्याने प्रवेशासाठी परीक्षेचे धोरण लागू करण्यात आले.

पलूस तालुक्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय पलूस, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली), डॉ. जी. डी. बापू लाड महाविद्यालय कुंडल या महाविद्यालयामध्ये बीसीए, बीबीए, बीबीएम हे अभ्यासक्रम आहेत. चालू वर्षी प्रथमच सीईटी 2024 ही  प्रवेश परीक्षा झाली.  परंतू, या परीक्षेची पालक, विद्यार्थ्यांना माहिती नव्हती. त्यामुळे शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.

सीईटीचा निकाल 17 जून रोजी लागणार आहे. आतापर्यंत बारावीतील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात होता. परंतू या वर्षी सीईटीतील गुणांवर प्रवेश देण्यात येणार आहे. महाविद्यालयांना पूर्वीप्रमाणे थेट प्रवेश देता येणार नाहीत. आता शासनाच्या सीईटीमधून विद्यार्थी घ्यावे लागणार आहेत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमबीए, एमसीए या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम हे पदवी शिक्षणक्रमही अखत्यारित घेतले आहेत. त्यामुळे त्यांना व्यावसायिक शिक्षणक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे. तालुक्यातील पलूस, रामानंदनगर, कुंडल या महाविद्यालयांत या अभ्यासक्रमासाठी जागा रिक्त राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा आणखी एकदा घ्यावी, अशी मागणी महाविद्यालये आणि पालकांनी केली आहे.