काँग्रेस अकोल्यातून उमेदवार मागे घेणार? शरद पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण

| Updated on: Apr 02, 2024 | 7:44 PM

अकोल्याच्या लोकसभा मतदारसंघाबाबत आता ट्विस्ट निर्माण झालाय. कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसने देखील या मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. पण यानंतर शरद पवार यांनी अकोलाच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस अकोल्यातून उमेदवार मागे घेणार? शरद पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. स्वत: प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच उमेदवारांचीदेखील घोषणा केली. असं असलं तरी प्रकाश आंबेडकर यांनी काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. अर्थात याबाबतच्या घडामोडी जास्त घडण्याआधीच काँग्रेसने काल बॉम्ब टाकला. काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एका मराठा समाजाच्या चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून अकोला लोकसभा मतदारसंघासाठी अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आता लोकसभा निवडणुकीसाठी कडवं आव्हान उभं राहिलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.

शरद पवार आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार एकाच गाडीने प्रवास करत असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांच्या हातात गाडीचं स्टेरिंग होतं. तर शरद पवार त्यांच्या बाजूला बसले होते. यावेळी पत्रकारांनी अकोल्याच्या जागेबाबात प्रश्न विचारला असता शरद पवारांनी काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“अकोल्यातील काँग्रेसच्या उमेदवारीबाबत काँग्रेससोबत चर्चा करणार”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. “वेळ आहे, त्यावर काँग्रेसशी चर्चा करता येईल”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार असणार आहे.काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी शरद पवारांना वंचित बहुजन आघाडी बारामतीतही उमेदवार देण्याबाबतचा प्रश्न विचारला असता, “बारामतीत वंचित उमेदवार देणार असेल तर चांगली गोष्ट आहे”, असं शरद पवारांनी म्हटलं.

‘आमचे वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न’

दरम्यान, शरद पवार यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतही त्यांनी वंचितच्या प्रश्नावर उत्तर दिलं. “लोकसभा निवडणुकीत काय होईल ते सांगता येणार नाही. पण वंचितने आमच्यासोबत यावे, असा आमचा प्रयत्न आहे. वंचितमुळे 2019 सारखा निकाल येईल का? ते आता सांगता येणार नाही. कोणाला निवडून द्यायचे आहे, यापेक्षा कोणाचा पराभव करायचा आहे, ही विचारधारा पाहता येईल. नागपूरात राजकीय शक्ती पुरेशी नाही. आम्ही पर्याय देण्याचा प्रयत्न केला”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

“नागपुरातील नेता उपमुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांचा काळ संपला असे म्हटले होते. निवडणुकी नंतर जी स्थिती आली तेव्हा ते विरोधात राहिले आणि शरद पवार सत्तेत होते. सातारा 100 टक्के आम्ही जिंकतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसजवळ चांगले उमेदवार आहेत”, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

“दिल्लीतीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज तुरुंगात आहेत. ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली, एकामागे एक विरोधकांना तुरुंगात पाठवण्याचे काम सुरु आहे. वेगळी विचारधारा असणाऱ्यांना अटक केली जात आहे. ज्यांनी चुकीचे काम केलं त्यांना धडा शिकवू, असं अर्थमंत्री म्हणत होते.
आज अघोषित इमर्जन्सी आपण देशात पाहत आहोत. देशात चिंतेचं वातावरण आहे”, अशी भूमिका शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मांडली.