‘भाभीजी घर पर है’मधील अभिनेता शूटिंगदरम्यान अचानक कोसळला; व्हिलचेअरवर आणलं मुंबईत

| Updated on: Mar 25, 2025 | 1:27 PM

'भाभीजी घर पर है' या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ शेखच्या प्रकृतीबद्दलची अपडेट समोर आली आहे. सेटवर शूटिंगदरम्यान तो अचानक बेशुद्ध झाला होता. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईत उपचारासाठी आणलं गेलं.

भाभीजी घर पर हैमधील अभिनेता शूटिंगदरम्यान अचानक कोसळला; व्हिलचेअरवर आणलं मुंबईत
Aasif Sheikh
Image Credit source: Instagram
Follow us on

‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत विभुती नारायण मिश्रा यांची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ मिश्रा शूटिंगदरम्यान बेशुद्ध झाला. सेटवर कोसळल्यानंतर आसिफला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं. या घटनेनंतर आता आसिफने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सेटवर नेमकं काय घडलं होतं आणि आता त्याची प्रकृती कशी आहे, याविषयी त्याने माहिती दिली. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेचं शूटिंग देहरादूनमध्ये पार पडत होतं. सायटिकाच्या वेदनांमुळे (sciatica pain) बराच त्रास झाल्याचं स्पष्ट केलं.

“मी भाभीजी घर पर है या मालिकेसाठी देहरादूनमध्ये शूटिंग करत होतो. शूटिंगदरम्यान माझा पाय सुन्न झाला होता आणि सायटिकाच्या वेदनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. मला व्हिलचेअरवरून मुंबईला आणलं गेलं आणि आता मला डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मी 18 तारखेला मुंबईत आलो आणि तेव्हापासून मी आराम करतोय. माझ्यावर उपचार सुरू आहेत. अजून पुढील आठवडाभर मी आराम करणार आहे. त्यानंतर मी कामावर परतेन”, असं आसिफने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मालिकेत आसिफ एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत होता, तेव्हाच त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. ‘झूम’ या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, त्या सीनमध्ये प्रचंड मेहनतीचं काम होतं. त्यात बरीच शारीरिक हालचाल होती. अशाच सीनच्या शूटिंगदरम्यान आसिफची प्रकृती बिघडली. देहरादूनमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला लगेचच मुंबईत आणलं गेलं आणि इथे पुढील उपचार पार पडले.

आसिफ गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करतोय. त्याने ‘हम लोग’ या मालिकेतून सुरुवात केली. त्यानंतर ‘येस बॉस’, ‘दिल मिल गए’ आणि ‘चिडिया घर’ या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. आसिफ शेख 1988 पासून टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत काम करतोय. त्याने ‘समंदर’, ‘बाजार’, ‘मेहंदी तेरे नाम की’, ‘हसी तो फंसी’, ‘डिटेक्टिव्ह करण’, ‘मिली’ यांमध्येही काम केलंय. तर ‘करण अर्जुन’, ‘पांडव’, ‘मृत्यूदाता’, ‘बनारसी बाबू’, ‘विक्रम’ आणि ‘अवजार’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत.