मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत आहोत..; अभिषेक बच्चनच्या व्हिडीओने खळबळ, आराध्याचाही उल्लेख

| Updated on: Aug 10, 2024 | 1:22 PM

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. अशातच अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो घटस्फोटाविषयी बोलताना दिसत आहे.

मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत आहोत..; अभिषेक बच्चनच्या व्हिडीओने खळबळ, आराध्याचाही उल्लेख
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहेत. या चर्चांदरम्यान अंबानींच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळे आले. त्यानंतर ऐश्वर्याला अभिषेकशिवाय परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहिलं गेलं. त्याचदरम्यान अभिषेकसुद्धा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पहायला एकटाच गेला. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळत गेली. अशातच आता एका व्हिडीओमुळे ऐश्वर्या-अभिषेकच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ अभिषेकचा असून त्यात तो ऐश्वर्याला घटस्फोट देणार असल्याचं म्हणतोय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिषेक म्हणतोय, “या जुलै महिन्यात मी आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेली काही वर्षे आराध्यासाठी फार कठीण होती. पण आज मी इथे ऐश्वर्याला घटस्फोट देण्यामागचं कारण स्पष्ट करणार आहे.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमागचं सत्य काय?

या व्हिडीओमध्ये अभिषेक जरी ऐश्वर्या आणि घटस्फोटाबद्दल बोलताना दिसत असला तरी तो खरा नाही, असं अनेकांनी म्हटलंय. ‘हा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला आहे’, असं एकाने लिहिलंय. यात अभिषेक जे बोलतोय ते त्याच्या ओठांच्या हालचालींशी मिळतंजुळतं नसल्यानेही व्हिडीओ डीपफेक असल्याचं म्हटलं जातंय. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा अन्य ऑनलाइन टूल वापरून अभिषेकच्या जुन्या व्हिडीओवर खोटा ऑडिओ लावून तो व्हायरल केल्याचं कळतंय. त्यावरून अनेकांनी टीकासुद्धा केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याबद्दल असे बनावट व्हिडीओ बनवू नका, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली होती. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित होती. एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती. त्यात ‘इंडियन इक्स्प्रेस’च्या ‘आय मॅगझिन’मधील लेख होता. ‘जेव्हा प्रेम सोपं होणं थांबतं,’ असं त्या पोस्टवर लिहिलेलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटस्फोटाविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. हीच पोस्ट आता अभिषेकने लाईक केल्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळी एण्ट्री केली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. किमान अभिषेकने तरी त्या दोघींसोबत यायला हवं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले होते. बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यात नक्कीच काही आलबेल नाही, अशाही चर्चा होत्या.