‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधून ‘या’ प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट; ‘शेवटाकडे होणारा प्रवास त्रासदायक..’

| Updated on: Aug 07, 2024 | 11:47 AM

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अशातच त्यातील एक प्रसिद्ध कलाकार मालिकेचा निरोप घेणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा करण्यात आला.

सातव्या मुलीची सातवी मुलगीमधून या प्रसिद्ध कलाकाराची एक्झिट; शेवटाकडे होणारा प्रवास त्रासदायक..
'सातव्या मुलीची सातवी मुलगी'
Image Credit source: Instagram
Follow us on

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षक ज्या घटनेची प्रतीक्षा करत होते, अखेर तो क्षण त्यांना मालिकेत पहायला मिळणार आहे. नेत्राला प्रसूतीकळा सुरू होतात. त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य प्रकाशझोत पसरतो आणि नेत्री जुळ्यांना जन्म देते. त्यानंतर नेत्रा विरोचकाचा वध करते. मालिकेत विरोचकाचा वध झाल्यानंतर रुपाली या भूमिकेचं काय होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अखेर त्याचं उत्तर समोर आलं आहे. रुपालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यावर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत.

मालिकेत विरोचकाचा मृत्यू होणार असं दाखवण्यात येणार आहे, तर मग रुपालीची मालिकेतून एक्झिट होणार का? असा प्रश्न ऐश्वर्या यांना विचारण्यात आला होता. ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाल्या, “रुपाली या पात्राची एक्झिट होणार हे कन्फर्म आहे. यानंतर मालिकेत रुपाली परत येणार नाही. पण यापुढील मालिकेचं कथानक खूपच रंजक असेल. नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश आहे. त्यामुळे विरोचक अमर राहणार आहे. पण या सीक्वेन्सनंतर रुपालीची मालिकेतून एक्झिट कन्फर्म आहे.”

हे सुद्धा वाचा

या मालिकेविषयी त्या पुढे म्हणाल्या, “यात माझी भूमिका खूप चांगली होती. कोणतीही भूमिका संपते तेव्हा वाईट तर वाटतंच. माझ्यासाठी तो भावूक क्षण असतो. कारण ती भूमिका आपण तेवढा काळ जगत असतो. त्यामुळे हा प्रवास जेव्हा शेवटाकडे येतो, तेव्हा खूप त्रास होतो. त्यातही या मालिकेची गोष्टच वेगळी होती. त्यात काम करताना मला खूप मजा आली. आम्ही सेटवर ऑफस्क्रीनसुद्धा खूप धमाल केली. मोकळ्या वेळेत आम्ही रील्स बनवायचो. ही सगळी मजा मी खूप मिस करणार आहे.”

सप्टेंबर 2022 मध्ये या मालिकेची सुरुवात झाली. त्यात अभिनेत्री तितिक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील काल्पनिक कथेला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. आतापर्यंत या मालिकेचे 500 हून अधिक एपिसोड्स झाले आहेत.