ऐश्वर्या रायच्या सहअभिनेत्याने लग्नाच्या 15 वर्षांनंतर घेतला घटस्फोट; म्हणाला ‘घाईगडबडीत..’

| Updated on: Sep 10, 2024 | 8:46 AM

प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि ऐश्वर्या रायचा सहअभिनेता जयम रवी याने लग्नाच्या 15 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने हा निर्णय जाहीर केला. जयम रवीने 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटात ऐश्वर्यासोबत काम केलं होतं.

ऐश्वर्या रायच्या सहअभिनेत्याने लग्नाच्या 15 वर्षांनंतर घेतला घटस्फोट; म्हणाला घाईगडबडीत..
अभिनेता जयम रवी, त्याची पत्नी आणि मुलं
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात काम करणारा प्रसिद्ध तमिळ अभिनेता जयम रवी याने पत्नीला घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतर पत्नी आरती रवीपासून विभक्त होत असल्याचं त्याने सोशल मीडियावर जाहीर केलंय. जयम आणि आरती यांना दोन मुलं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अखेर सोमवारी जयमने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम दिला. वैयक्तिक कारणांमुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.

एक्स (ट्विटर) अकाऊंटवर जयम रवीने दोन पोस्ट लिहिले आहेत. ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद’, असं कॅप्शन देत त्याने हे पोस्ट लिहिले आहेत. आयुष्य हे कशा पद्धतीने विविध अध्यायांचा प्रवास असल्याचं सांगत त्याने जड अंत:करणाने ही वैयक्तीक माहिती देत असल्याचं म्हटलंय. ‘बराच विचार आणि चर्चेनंतर मी पत्नीला घटस्फोट देण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय घाईगडबडीत घेतला गेलेला नाही. त्यामागे काही वैयक्तिक कारणं असून यातच सर्वांचं भलं आहे असा मला विश्वास आहे’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. रवीने चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आदर करण्याची आणि त्याच्या लग्नाबाबत कोणतेही पूर्वग्रह न बाळगण्याची विनंती केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. कोणतेही पूर्वग्रह बाळगू नका, अफवांवर आणि आरोपांवर विश्वास ठेवू नका. हे प्रकरण खासगीच राहू द्या’, असं त्याने पुढे लिहिलंय. यावर्षी जून महिन्यात लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसानंतर आरतीने सोशल मीडियावरून पतीसोबतचे सर्व फोटो डिलिट केले होते. आरती ही प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्मात्या सुजाता विजयकुमार यांची मुलगी आहे. जयम रवी आणि आरतीने 2009 मध्ये लग्न केलं होतं.

जयम रवी नुकताच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘इराइवान’ आणि ‘सायरन’ हे त्याचे चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाले होते. तो लवकरच ‘ब्रदर’ आणि ‘कदलिका नेरामलाई’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. जयम रवीने ऐश्वर्या राय आणि कंगना राणौत यांच्यासोबतही काम केलंय.