Avinash Sachdev | रुबिनासोबतच्या नात्यावर अखेर अविनाशने सोडलं मौन; म्हणाला “तिला जोपर्यंत राहायचं होतं..”

| Updated on: Aug 12, 2023 | 11:24 AM

अविनाश आणि रुबिना यांनी 2012 मध्ये ब्रेकअप केलं. त्यानंतर 2015 मध्ये अविनाशने 'इस प्यार को क्या नाम दूँ?' या मालिकेतील सहअभिनेत्री शाल्मली देसाईशी लग्न केलं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Avinash Sachdev | रुबिनासोबतच्या नात्यावर अखेर अविनाशने सोडलं मौन; म्हणाला तिला जोपर्यंत राहायचं होतं..
Avinash Sachdev and Rubina Dilaik
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सहभागी झालेला टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता अविनाश सचदेव त्याच्या रिलेशनशिप्समुळे सर्वाधिक चर्चेत आला. ‘छोटी बहू’ या मालिकेत अविनाशने अभिनेत्री रुबिना दिलैकसोबत काम केलं होतं. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रुबिनासोबतच्या नात्यावर आता बऱ्याच वर्षांनंतर अविनाशने मौन सोडलं आहे. ‘ते लहानपणीचं प्रेम होतं’, अशा शब्दांत अविनाशने त्यांच्या नात्याचं वर्णन केलं. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला ‘एक्स्पायरी डेट’ असते, असंही त्याने म्हटलंय. अविनाश गेल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला.

रुबिनासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “आम्ही दोघं त्यावेळी लहान होतं. मी 22 वर्षांचा आणि ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान 20 वर्षांची होती. आम्ही एकमेकांसोबत घालवलेला वेळ खूप सुंदर होता, ते वयच तसं होतं. पण आता जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, तेव्हा त्यावेळी नात्यामागे असलेलं उद्दिष्ट खूप वेगळं वाटतं. लहानपणीचं प्रेम आणि वयानुसार मोठं झाल्यानंतर झालेलं प्रेम यात बराच फरक असतो.”

हे सुद्धा वाचा

“ते वयच खूप भोळं होतं आणि आम्ही दोघंही टीव्ही इंडस्ट्रीत नवीन होतो. माझ्यासोबत नवी हिरोइन होती आणि तिच्यासोबत नव्या हिरोची जोडी होती. ठीक आहे, अशा वेळी काही गोष्टी घडतात. तो काळ खूप सुंदर होता. त्यावेळी जोपर्यंत राहायचं होतं तोपर्यंत मी खूप खुश होतो. नातं म्हणजे काही लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी नाही ना, जीवन के साथ भी, जीवन के बाद भी. प्रत्येक गोष्टीला एक्स्पायरीची तारीख असते. मी गोष्टींकडे अशा दृष्टीकोनातून पाहतो. जोपर्यंत त्या नात्याला टिकायचं होतं, ते टिकलं आणि तोपर्यंत ते खूप सुंदर होतं”, असंही तो पुढे म्हणाला.

अविनाश आणि रुबिना यांनी 2012 मध्ये ब्रेकअप केलं. त्यानंतर 2015 मध्ये अविनाशने ‘इस प्यार को क्या नाम दूँ?’ या मालिकेतील सहअभिनेत्री शाल्मली देसाईशी लग्न केलं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या दोन वर्षांतच ते विभक्त झाले. 2019 मध्ये अविनाश हा अभिनेत्री पलक पुरस्वानीला डेट करू लागला. नुकतेच हे दोघं बिग बॉस ओटीटी 2 मध्ये एकत्र झळकले. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं.