बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयजयकार का केला नाही? अखेर अरबाज पटेलने दिलं उत्तर

| Updated on: Sep 25, 2024 | 9:33 AM

गेल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडला. घरात असताना एका घटनेमुळे नेटकऱ्यांनी त्याच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर आता त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात शिवरायांचा जयजयकार का केला नाही? अखेर अरबाज पटेलने दिलं उत्तर
Arbaz Patel
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून नुकताच अरबाज पटेल बाहेर पडला. स्प्लिट्सविला फेम अरबाज बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेरही चांगलाच चर्चेत होता. निक्की तांबोळीसोबतची जवळीक आणि घरातील आक्रमकपणा यामुळे त्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. बिग बॉसच्या घरात असताना तो आणखी एका कारणामुळे ट्रोलिंगचा शिकार झाला होता. बिग बॉसमधून जेव्हा पुरुषोत्तम दादा पाटील बाहेर पडले, तेव्हा सर्वांसोबत मिळून अरबाजने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यावर आता त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

जेव्हा बिग बॉसच्या घरातून कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले, तेव्हा निरोप घेताना त्यांनी अनेक घोषणा दिल्या होत्या. सुरुवातीला संतांचा जयजयकार आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. त्यांच्यापाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली होती. मात्र अरबाज पटेल शांत उभा होता. यावरूनच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

अरबाज पटेलचं स्पष्टीकरण-

“हे सगळं कधी घडलं मला माहीत नाही. कारण मी तसा नाही. मी संभाजीनगरमध्ये राहतो. सर्वांनाच माहीत आहे की ती जागा ऐतिहासिक आहे. आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहोत. मी बिग बॉसच्या घरात असताना माझ्याच विचारांमध्ये मग्न असायचो. त्यामुळे हे सगळं कधी घडलं मला कळलंच नाही. मी धर्म धरून राहिलो असतो तर बिग बॉसमध्ये कशाला आलो असतो. मी तसा नाहीये. मी सगळ्याच धर्माच्या बाबतीत संवेदनशील आहे. जर लोकांची माझ्यावर नाराजी असेल तर मी त्यांची माफी मागतो”, असं तो ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

अरबाजच्या एलिमिनेशननंतर ढसाढसा रडली निक्की-

गेल्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि अरबाज पटेल या पाच जणांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. त्यापैकी कॅप्टन अरबाजला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. कॅप्टनच एलिमिनेट होण्याची बिग बॉस मराठीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी सर्वाधिक मतं सूरजला होती. तर वर्षा आणि जान्हवी यांनासुद्धा पुरेशी मतं मिळाली होती. अरबाज आणि निक्की हे दोघं डेंजर झोनमध्ये होते. ही जोडी बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर तुफान चर्चेत राहिली आहे. यानंतर अखेर अरबाजला बाद व्हावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरात निक्कीला अरबाजचाच आधार होता, त्यामुळे त्याच्या एलिमिनेशनचं कळताच ती ढसाढसा रडू लागली.