‘बिग बॉस’च्या विजेत्याला पोलिसांकडून अटक; नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: Dec 21, 2023 | 9:07 AM

सज्जनार यांच्या तक्रारीनंतर तेलंगणा पोलिसांनी पल्लवी प्रशांत आणि त्याच्या चाहत्यांवर आयपीसी कलम 147, 148, 290, 353, 427 आणि 149 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बिग बॉस तेलुगूच्या ग्रँड फिनालेनंतर जो काही गोंधळ झाला, त्याचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर समोर आले आहेत.

बिग बॉसच्या विजेत्याला पोलिसांकडून अटक; नेमकं काय आहे प्रकरण?
Bigg Boss Telugu 7 winner Pallavi Prashanth
Image Credit source: Instagram
Follow us on

हैदराबाद : 21 डिसेंबर 2023 |बिग बॉस तेलुगू’च्या सातव्या सिझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मात्र या ग्रँड फिनालेनंतर विजेता पल्लवी प्रशांतला पोलिसांनी अटक केली. फिनालेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अन्नपूर्णा स्टुडिओज जवळील परिसरातील शांती भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केली. बुधवारी ही सर्व घटना घडली. पल्लवी प्रशांतच्या चाहत्यांनी शोचा रनरअप ठरलेल्या अमरदीप चौधरीच्या कारची तोडफोड केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर प्रशांत आणि त्याच्या काही चाहत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पल्लवी प्रशांतला पुढील चौकशीसाठी जुबिली हिल्स पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. 17 डिसेंबर रोजी पल्लवी प्रशांतच्या चाहत्यांनी स्टुडिओला घेराव घातला आणि रनरअप अमरदीप चौधरीच्या कारची तोडफोड केली.

‘बिग बॉस तेलुगू 7’च्या ग्रँड फिनालेनंतर नेमकं काय घडलं?

‘बिग बॉस तेलुगू 7’चा ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर स्टुडिओच्या परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पल्लवी प्रशांतच्या चाहत्यांनी इतर काही स्पर्धकांच्या गाड्यांची तोडफोड केली. रनरअप ठरलेल्या अमरदीपच्या कुटुंबीयांनी त्यांना विनंती केली, तरीसुद्धा चाहते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अमरदीपसोबतच त्यांनी इतरही काही स्पर्धकांच्या कारचं नुकसान केलं. इतकंच नव्हे तर RTC बसवरही त्यांनी हल्ला केला होता.

हे सुद्धा वाचा

बसवरही हल्ला

TSRTC चे व्यवस्थापकीय संचालक व्ही. सी. सज्जनार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित या घटनेची तक्रार केली. ‘बिग बॉसच्या फिनालेनंतर काही लोकांनी हैदराबादमधील कृष्णनगर अन्नपूर्णा स्टुडिओ परिसरातील बसेसवर हल्ला केला. या हल्ल्यात 6 बसेसचं नुकसान झालं आहे. या घटनेप्रकरणी RTC कडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फँडमच्या नावाखाली केला जाणारा हा मूर्खपणा समाजासाठी योग्य नाही. जे RTC बस लोकांना सुरक्षितरित्या त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम करतात, त्यांच्यावरच हल्ला करणं म्हणजे हा समाजावरच हल्ला आहे. TSRTC च्या व्यवस्थापनाकडून या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष केलं जाणार नाही’, अशा शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला.