कंगना राणौत पुन्हा नको ते बोलली; भाजपा नेत्याचा थेट इशारा

| Updated on: Sep 19, 2024 | 9:42 AM

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भिंद्रनवाले यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर कंगना यांना थेट भाजप नेत्याकडून सक्त ताकिद मिळाली आहे.

कंगना राणौत पुन्हा नको ते बोलली; भाजपा नेत्याचा थेट इशारा
Kangana Ranaut
Follow us on

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. खासदार होण्याआधीही कंगना त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असायच्या. आता खासदार झाल्यानंतरही त्या आपल्या वक्तव्यामुळे सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक जर्नल सिंग भिंद्रनवाले यांच्याविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कंगनाला सक्त ताकीद मिळाली आहे. कंगना यांनी अनावश्यक टिप्पणी करू नये, ज्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावू शकतील, असं भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश म्हणाले. एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित सोमप्रकाश यांनी कंगना यांना शिस्त पाळण्याचं पंजाबमधील शांतता भंग करणं टाळा असं आवाहन केलंय.

‘कंगना यांनी संत जर्नल सिंग आणि शीख समुदायाविरोधात अनावश्यक टिप्पणी करू नये. अशा वक्तव्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातात. कंगना यांनी शिस्तीचं पालन करावं. कोणालाही पंजाबमधील शांतता भंग करण्याची परवानगी दिली जाऊ नये’, असं त्यांनी लिहिलंय.

भिंद्रनवाले यांच्याबद्दल काय म्हणाल्या कंगना राणौत?

कंगना सध्या त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. यामध्ये त्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. ‘न्यूज 18 इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना यांनी भिंद्रनवाले यांना पंजाबच्या इतिहासातील फूट पाडणारी व्यक्ती असं संबोधलं. इतकंच नव्हे तर तिने त्यांना ‘दहशतवादी’ असंही म्हटलंय. भिंद्रनवाले यांची शीख धर्माच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या दमदमी टकसालच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लूस्टारदरम्यान त्यांची हत्या करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

“ते काही संत नव्हते तर तो एक दहशतवादी होता. हा आपल्या इतिहासाचा एक भाग आहे, जो जाणीवपूर्वक लपवून ठेवला गेला आहे. आपल्याला याबद्दल सांगितलं जात नाही”, असं कंगना मुलाखतीत म्हणाल्या. पंजाबची 99 टक्के लोकसंख्या भिंद्रनवाले यांना संत म्हणून पाहत नाही, असंही मत कंगनाने नोंदवलंय. त्यांच्या या वक्तव्यावर शिरोमणी अकाली दलासह शीख संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांनी कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटावरही आरोप केले आहेत. चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये आणि शीख समुदायाचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.