‘हमारे बारह’चा वाद पोहोचला कोर्टात; रोखलं चित्रपटाचं प्रदर्शन

| Updated on: Jun 06, 2024 | 2:10 PM

हा चित्रपट प्रदर्शित करण्याविरोधात त्यातील कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अनु कपूर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू मांडली होती.

हमारे बारहचा वाद पोहोचला कोर्टात; रोखलं चित्रपटाचं प्रदर्शन
Hamare Baarah movie
Image Credit source: Instagram
Follow us on

कमल चंद्रा दिग्दर्शित ‘हमारे बारह’ या चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाचं प्रदर्शन 14 जूनपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 10 जून रोजी होणार आहे. तर अनु कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘हमारे बारह’ हा चित्रपट 7 जून रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटावरून वाद सुरू असताना अनु कपूर आणि दिग्दर्शकांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या चित्रपटाच्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार त्यांनी शिंदेंकडे केली होती. त्यावर शिंदेंनी कोणतीही काळजी न करता चित्रपट प्रदर्शित करावा, असं म्हणत सुरक्षेचं आश्वासन दिलं होतं.

‘हमारे बारह’ या चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटात मंजूर अली खान संजारी या पुरुषाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू बाळाच्या जन्मादरम्यान होतो. त्यानंतर दुसऱ्या पत्नीपासून त्याला अधिकाधिक मुलांची अपेक्षा असते. सहाव्या वेळी गरोदर असताना तिच्या जीवाला धोका असल्याचा इशारा डॉक्टर देतात. मात्र तरीही खान त्याच्या पत्नीच्या गर्भपाताला नकार देतो. तेव्हा सावत्र आईला वाचवण्याचा निर्धार त्याची मुलगी अल्फिया करते. आईच्या गर्भपाताच्या मागणीसाठी ती वडिलांना कोर्टात खेचते.

कोर्टात काय घडलं?

मुंबई उच्च न्यायालयात या चित्रपटाविषयी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते अजहर तांबोळी यांनी मयूर खांडेपारकर, अनीसा चीमा आणि रेखा मुसळे या वकिलांच्या माध्यमातून ‘हमारे बारह’ चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी केली. या चित्रपटामुळे केवळ मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या जात नाहीयेत तर कुराणाचंही चुकीचं चित्रण केलं जातंय, असा आरोप त्यांनी केला आहे. या याचिकेतून सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्रावरही प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे ते प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. कोर्टात वकील खांडेपारकर यांनी या चित्रपटाच्या ट्रेलर आणि प्रमोशन व्हिडीओमधील काही आक्षेपार्ह संवादांकडे लक्ष वेधलं. कोणत्याच दृष्टीने या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

सेन्सॉर बोर्डाची बाजू मांडणारे वकील अद्वैत सेठना यांनी यावेळी स्पष्ट केलं की, हा चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही सीन्स आणि संवाद काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला होता. त्याचप्रमाणे चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाचं नियंत्रण असलं तरी ट्रेलर आणि प्रमोशनल व्हिडीओंवर त्यांचं कोणतंही नियंत्रण नाही, असंही सेठना त्यांनी स्पष्ट केलं. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने याप्रकरणी पुढील सुनावणीची आवश्यकता असल्याचं सांगत प्रदर्शन पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.

कलाकारांना धमक्या

या चित्रपटात अनु कपूर, मनोज जोशी आणि पारितोष त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये महिलांच्या वेदनांचं धाडसी कथन केल्याचं पहायला मिळालं. यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा मांडण्यात आला असून त्यामुळे महिलांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे दाखवण्यात आलं होतं. मात्र हाच टीझर काहींना खटकला असून चित्रपटाच्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.