‘तर त्याला ‘बिनविरोध’ कसं म्हणणार?’, सुरतमधील भाजपच्या विजयाबाबत मराठी दिग्दर्शकाचा सवाल

| Updated on: Apr 23, 2024 | 1:18 PM

गुजरातच्या सुरत मतदारसंघातील काँग्रेस आणि इतर पर्यायी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोधी विजयी घोषित करण्यात आलं.

तर त्याला ‘बिनविरोध’ कसं म्हणणार?, सुरतमधील भाजपच्या विजयाबाबत मराठी दिग्दर्शकाचा सवाल
सुरतमधील भाजपाच्या विजयावर समीर विद्वांस यांचा प्रश्न
Image Credit source: Twitter
Follow us on

गुजरातच्या सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी तसंच पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचं उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर अन्य 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यावर काँग्रेसने घणाघाती टीका केली असून पराभवाच्या भीतीने मॅचफिक्सिंग करण्यात आल्याचा आरोप केला. याप्रकरणी आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित प्रश्न उपस्थित केला आहे. नोटाचा पर्याय असतानाही तो राबवलाच गेला नाही तर त्याला ‘बिनविरोध’ कसं म्हणणार, असा सवाल त्यांनी केला आहे. समीर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

समीर विद्वांस यांची पोस्ट-

‘माझ्या मनात एक प्रश्न आहे. कमी ज्ञानामुळे असेल पण तरी.. जेव्हा एखाद्या ठिकाणी मतदान न होता थेट विजयी घोषित केलं जातं (ताजं उदाहरण सूरत) तेव्हा तिथल्या मतदारांच्या नोटा (NOTA: None of the Above) निवडण्याच्या अधिकारावर गदा येत नाही का? मला पूर्ण कल्पना आहे की NOTA मोजलं गेलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही (जे ग्राह्य धरलं गेलं पाहिजे हा भाग वेगळा) पण तरीही मतदाराला ‘वरील पैकी कोणीच नाही’ हे निवडता आलंच पाहीजे ना? काहीही कारणांमुळे जरी एकच उमेदवार शिल्लक राहिलाय तरीही तो उमेदवार विरूद्ध NOTA अशी दुरंगी लढत होऊ देत ना. निवडून तोच येईल पण मतदानाचा हक्क तर बजावता येईल आणि त्या उमेदवाराविषयीचं लोकांचं खरं मत तरी कळेल. NOTA नसतंच तर भाग वेगळा पण असतानाही ते राबवलंच गेलं नाही तर त्याला ‘बिनविरोध’ कसं म्हणणार,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

गुजरातमध्ये सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. कुंभोणी यांच्या तीन अनुमोदकांनी आपण अनुमोदक नसल्याचं प्रतिज्ञापत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. कुंभोणी यांनी आपल्या अनुमोदकांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेसने याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अनुमोदक स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचा दावा करतात. अन्य पक्षांचे उमेदवार, अपक्ष आपली उमेदवारी मागे घेतात. हा योगायोग नव्हे. त्यामुळे सुरतमधील निवडणुकीला स्थगिती देऊन नव्याने निवडणूक घ्यावी, अशी लेखी मागणी करण्यात आल्याचं काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केलं.