अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर संजयने घेतली ‘वेलकम 3’मधून माघार? खरं कारण आलं समोर

| Updated on: May 22, 2024 | 3:45 PM

अभिनेता संजय दत्तने 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातून माघार घेतली आहे. अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र त्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

अक्षय कुमारसोबतच्या वादानंतर संजयने घेतली वेलकम 3मधून माघार? खरं कारण आलं समोर
Sanjay Dutt and Akshay Kumar
Image Credit source: Instagram
Follow us on

‘वेलकम’ आणि ‘वेलकम 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘वेलकम 3’ची घोषणा झाली. ‘वेलकम टू द जंगल’ असं या तिसऱ्या भागाचं नाव असून त्याच्या टीझरमध्ये मुन्ना आणि सर्किट म्हणजेच संजय दत्त आणि अर्शद वारसी दिसले. त्यांच्यासोबतच अभिनेता अक्षय कुमारसुद्धा होता. संजय दत्त, अर्शद वारसी आणि अक्षय कुमार ही स्टारकास्ट पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता वाढली. मात्र या चित्रपटातून संजय दत्तने माघार घेतल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. अक्षयसोबतच्या वादामुळे संजू बाबाने प्रोजेक्ट सोडल्याची चर्चा होती. पण या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजयने अक्षयमुळे नाही तर आजारपणामुळे चित्रपट सोडल्याचं कळतंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्तने काही महिन्यांपूर्वीच हा प्रोजेक्ट सोडला होता. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर चित्रपटातील ॲक्शन सीन्स करता येत नसल्याने त्याने माघार घेतल्याचं कळतंय. “संजय दत्त या चित्रपटासाठी खूप उत्सुक होता आणि त्याने शूटिंगलाही सुरुवात केली होती. पण दुर्दैवाने मढ आयलँडमध्ये एका दिवसाच्या शूटिंगनंतर त्याने दिग्दर्शकांना कळवलं की तो आरोग्याच्या कारणास्तव पुढील शूटिंग करू शकणार नाही. हे काही महिन्यांपूर्वी घडलं होतं. कॅन्सरशी झुंज आणि त्यापुढील उपचारामुळे त्याला शूटिंग पूर्ण करणं जमलं नव्हतं. वेलकम 3 हा चित्रपट जरी कॉमेडी असला तरी त्यात बरेच ॲक्शन सीन्स आहेत. संजयच्या भूमिकेच्या वाटेला ते सीन्स अधिक आले आहेत. ते जमणार नसल्यानेच त्याने नकार दिला”, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

संजय दत्तला स्टेज 4 फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये त्याने कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं. काही महिन्यांच्या उपचारानंतर तो कॅन्सरमुक्त झाला. ‘वेलकम 3’मधून संजयने माघार घेतल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टीने त्याची जागी घेतली. या चित्रपटाची शूटिंग अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. यामध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, सुनील शेट्टी यांच्यासोबतच रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, परेश रावल, जॉनी लिव्हर, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक यांच्याही भूमिका आहेत. अहमद खान या चित्रपटाचं शूटिंग करत असून येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.