Divya Dutta | जिवाशी खेळून आईने वाचवले होते दिव्या दत्ताचे प्राण; आत्मचरित्रात सांगितला किस्सा

| Updated on: Sep 25, 2023 | 2:07 PM

अभिनेत्री दिव्या दत्ताने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. दिव्या तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. तिच्या लहानपणीचा किस्सा आत्मचरित्रात सांगितला गेला आहे.

Divya Dutta | जिवाशी खेळून आईने वाचवले होते दिव्या दत्ताचे प्राण; आत्मचरित्रात सांगितला किस्सा
Divya Dutta
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री दिव्या दत्ता तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलिवूड इंडस्ट्रीत कोणतंही कनेक्शन नसताना दिव्याने स्वत:च्या अभिनयकौशल्यावर विशेष ओळख निर्माण केली. नव्वदच्या दशकात तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. दिव्या तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तिचा त्यावरून विश्वासच उडाला. म्हणूनच आजही ती सिंगल आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिव्या मूळची लुधियानाची आहे. तिथेच तिचं लहानपण गेलं आणि तिची आई डॉक्टर होती. दिव्या लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं. दिव्याला तिच्या आईनेच लहानाचं मोठं केलं.

दिव्याचे आई-वडील दोघंही डॉक्टर होते. भाऊसुद्धा डॉक्टर आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार तिने कधी केलाच नव्हता. मात्र दिव्याने वेगळा मार्ग निवडला आणि तिने बॉलिवूडमध्ये आपली विशेष छाप सोडली. आज ती जे काही आहे, त्याचं श्रेय दिव्या तिच्या आईला देते. करिअरच्या सुरुवातीला आईने दिव्याला खूप मदत केली. अनेकदा ती सेटवर नर्व्हस व्हायची, तेव्हा आई दिग्दर्शकांकडून कथा ऐकून दिव्याला समजावून सांगायची. दिव्याने तिच्या करिअरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिला खरी ओळख शाहरुख खान आणि प्रिती झिंटाच्या ‘वीर जारा’ या चित्रपटातून मिळाली. यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

अपहरणाचा किस्सा

दिव्या दत्तासोबत लहानपणी अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी तिच्या आईने आपल्या जिवाशी खेळून दिव्याचे प्राण वाचवले होते. या घटनेत दिव्या थोडक्यात बचावली होती. ‘मी अँड माँ’ या आत्मचरित्रात तिने हा किस्सा सांगितला आहे. एके दिवशी संध्याकाळी दिव्याच्या घरी एक पत्र आलं होतं. हे धमकीचं पत्र होतं आणि त्यातून खूप मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. जर ती रक्कम दिली नाही, तर डॉक्टरांच्या मुलांचं अपहरण केलं जाईल, असं त्यात लिहिलं होतं. या पत्राची माहिती पोलिसांना देण्यात आली होती आणि त्यानंतर सापळा रचला गेला. पत्रात दिलेल्या पत्त्यावर दिव्याची आई पोलिसांना घेऊन पोहोचली होती. घटनास्थळी पोलिसांनी सापळा रचून अपहरणकर्त्यांना पकडलं होतं.

हे सुद्धा वाचा