इंडिया इज इंदिरा..; कंगना यांचा अंगावर शहारे आणणारा ‘इमर्जन्सी’चा ट्रेलर

| Updated on: Aug 14, 2024 | 2:55 PM

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. कंगना यांचं दमदार अभिनय पाहून प्रेक्षक भारावले आहेत.

इंडिया इज इंदिरा..; कंगना यांचा अंगावर शहारे आणणारा इमर्जन्सीचा ट्रेलर
Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. जवळपास पावणेतीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये देशाच्या इतिहासातील बऱ्याच उल्लेखनीय घडामोडींची झलक पहायला मिळते. वडील आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी सत्तेवर येतात. ‘इमर्जन्सी’च्या या ट्रेलरमध्ये इंदिरा यांनी त्यांच्या वडिलांकडून सत्ता हिसकावून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची कथा इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळापुरतीच मर्यादित असल्याचं या ट्रेलरवरून दिसतंय. 1966 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात, आणीबाणीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय, मूलभूत अधिकारांवर आणलेली गदा या सर्वांची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटनाही दाखवण्यात येणार असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर समजतंय.

‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’, ‘मीच कॅबिनेट आहे’, असे संवाद या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतून पुन्हा एकदा कंगनाच्या दमदार अभिनयकौशल्याची झलक पहायला मिळते. मुलगा संजय गांधी यांना इंदिरा यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा खलनायक म्हणून दर्शवल्याचंही यात पहायला मिळतंय.

हे सुद्धा वाचा

बायोपिकमध्ये अनेकदा नायिक किंवा नायिकेचं सकारात्मक चित्रण केलं जातं. परंतु ‘इमर्जन्सी’मध्ये कंगना यांनी इंदिरा गांधींना एक निरंकुश नेता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी (श्रेयस तळपदे) यांच्या व्यक्तिरेखेचाही समावेश आहे. तर कठोर टीकाकार म्हणून जयप्रकाश नारायण यांची भूमिका अनुपम खेर यांनी साकारली आहे. याशिवाय चित्रपटात मिलिंद सोमण, सतिश कौशिक, महिमा चौधरी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा कंगना यांनीच लिहिली असून दिग्दर्शनाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.

कोण कोणत्या भूमिकेत?

अनुपम खेर- जयप्रकाश नारायण
श्रेयस तळपदे- अटल बिहारी वाजपेयी
सतिश कौशिक- जगजीवन राम
महिमा चौधरी- पुपुल जयकार
मिलिंद सोमण- फिल्ड मार्शल सॅम माणेक्शाँ
विशाक नायक- संजय गांधी