मुलांचा काय दोष? लहानपणीच आईवडिलांच्या घटस्फोटाचं दु:ख झेललेल्या फरहानने सोडलं मौन

| Updated on: Aug 26, 2024 | 8:52 AM

अभिनेता फरहान अख्तरने त्याच्या लहानपणीच आईवडिलांच्या घटस्फोटाचं दु:ख झेललं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याच्या स्वत:च्या घटस्फोटावर कसा परिणाम झाला, याविषयी त्याने सांगितलं.

मुलांचा काय दोष? लहानपणीच आईवडिलांच्या घटस्फोटाचं दु:ख झेललेल्या फरहानने सोडलं मौन
अभिनेता फरहान अख्तर आणि त्याचं कुटुंब
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. त्याच वर्षी त्यांची मुलगी झोया अख्तरचा जन्म झाला. तर 1974 मध्ये फरहान अख्तरचा जन्म झाला. लग्नाच्या काही वर्षांनंतर जावेद आणि हनी विभक्त झाले. 1985 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, तर घटस्फोटाच्या एक वर्ष आधी 1984 मध्ये त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. जावेद यांच्या दुसऱ्या लग्नानंतर हनी यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला. झोया आणि फरहान यांनी त्यांच्या पालकांना विभक्त होण्याचं दु:ख झेललं होतं. जेव्हा फरहान अख्तरला त्याची दोन मुलं झाली, तेव्हा त्याचंसुद्धा लग्नसंबंध संपुष्टात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आईवडिलांच्या घटस्फोटाच्या स्वत:च्या आयुष्यावर काय परिणाम झाला, याविषयी फरहान मोकळेपणे व्यक्त झाला.

अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने 2000 मध्ये अधुना भभानीशी लग्न केलं होतं. त्याच वर्षी त्यांना मुलगी झाली आणि 2007 मध्ये अधुनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. फरहान आणि अधुना यांनी लग्नाच्या 15 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये हे दोघं कायदेशीररित्या विभक्त झाले. घटस्फोटानंतर अधुनाने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. त्यानंतर 2022 मध्ये फरहानने अभिनेत्री शिबानी दांडेकरशी दुसरं लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

पत्रकार फाये डिसूझा यांना दिलेल्या मुलाखतीत फरहानला त्याच्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला. “तू तुझ्या लहानपणी जे सहन केलंस, ते पाहता स्वत:च्या घटस्फोटाच्या वेळी सर्वकाही सावरणं किती कठीण होतं?”, असं त्याला विचारलं गेलं. त्यावर उत्तर देताना फरहानने सांगितलं की कशा पद्धतीने त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटाच्या घटनेनं त्याच्या स्वत:च्या घटस्फोटात मोठी भूमिका बजावली होती.

फरहान म्हणाला, “ते सर्व खूप कठीण होतं. अर्थातच मी लहान असताना माझ्या पालकांचा झालेला घटस्फोट हा त्याचा एक विशिष्ट पैलू होता. आईवडिलांचं विभक्त होणं काय असतं हे मी सहन केलं होतं आणि माझी अशी खूप भावना होती की माझ्या मुलांसोबत मी असं काही घडू देऊ शकत नाही. मी आणि अधुना मिळून त्यांच्यासोबत याविषयी मोकळेपणे आणि प्रामाणिकपणे बोललो. त्यांना समजावलं की आम्ही हे पाऊल का उचलतोय, यामागच्या कारणाचं तुमच्याशी काहीच देणंघेणं नाही. आम्ही हा निर्णय त्यांच्यामुळे नाही, त्यांनी जे केलं त्याच्यामुळेही नाही किंवा ते जन्माला आले म्हणूनही नाही घेतला.”

“ही दोन प्रौढ लोकांमधील गोष्ट आहे, ज्यांनी मित्र म्हणून ठरवलंय की त्यांना हे असं काहीतरी करायचं आहे. आमच्यासाठी सर्वोत्तम तेच होतं. परंतु एक गोष्ट अशी आहे जी मला आयुष्यभर माझ्या मनात ठेवून जगावं लागेल की ‘त्यांनी हे सर्व का सहन करावं? त्यांचा काय दोष होता?’ हा विचार सतत माझ्या मनात येतच राहणार. कदाचित हा विचार मनात ठेवूनच मला आयुष्यभर जगावं लागेल. लहानपणी माझ्यासोबत जे घडलं त्या घटनेनं आता मला त्याविषयी काय वाटतं यात मोठी भूमिका बजावली आहे”, अशा शब्दांत फरहानने भावना व्यक्त केल्या.