गोविंदाच्या बंदुकीतून सुटली गोळी; पायाला दुखापत, रुग्णालयात दाखल

| Updated on: Oct 01, 2024 | 10:09 AM

अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती त्याच्या पायाला लागली आहे. आज (मंगळवार) पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदाकडे परवाना असलेली बंदुक असून ती तपासत असतानाच चुकून त्यातून गोळी सुटली आहे.

गोविंदाच्या बंदुकीतून सुटली गोळी; पायाला दुखापत, रुग्णालयात दाखल
Govinda
Follow us on

अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदुक तपासून पाहत होता. त्याचवेळी चुकून त्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी गोविंदाच्या गुडघ्याला लागली आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गोविंदावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय.

कशी लागली गोळी?

गोविंदाचा मॅनेजर शशी याने ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की गोविंदा एका कामानिमित्त कोलकाताला जाण्यासाठी घरातून निघत होता. त्यावेळी तो नेहमीप्रमाणे परवाना असलेली बंदुक स्वत:सोबत घेत होता. ही बंदुक त्याच्या हातातून निसटली आणि त्यातून त्याच्या पायाला गोळी लागली. डॉक्टरांनी गोविंदाच्या पायातून गोळी काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचंही शशीने सांगितलं आहे.

चाहत्यांकडून काळजी व्यक्त

गोविंदाबद्दलची ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येतेय. सोशल मीडियावर अनेकांनी गोविंदाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. गोविंदाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. एकेकाळी त्याने बॉलिवूड गाजवलं होतं. आजही ‘हिरो नंबर वन’ म्हणून त्याची लोकप्रियता कायम आहे. गोविंदाने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये 150 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘कुली नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’, ‘स्वर्ग’, ‘साजन चले ससुराल’, ‘राजा बाबू’, ‘पार्टनर’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. 2019 मध्ये त्याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पहलाज निहलानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर गोविंदा कोणत्याच चित्रपटात झळकला नाही.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूड इंडस्ट्रीत बरीच वर्षे काम केल्यानंतर गोविंदाने राजकारणात प्रवेश केला. 2004 मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्याने राम नाइकविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोविंदाला विजय मिळाला होता. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला.