‘मरीमातेच्या मंदिराबाहेर उभा राहून..’; सूरजच्या संघर्षाबद्दल जितेंद्र आव्हाडांची पोस्ट

| Updated on: Oct 07, 2024 | 2:48 PM

बारामतीतल्या सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी 5'चं विजेतेपद पटकावल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी खास पोस्ट लिहिली आहे. जिंकलंस भावा... तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

मरीमातेच्या मंदिराबाहेर उभा राहून..; सूरजच्या संघर्षाबद्दल जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
Jitendra Awhad and Suraj Chavan
Image Credit source: Instagram
Follow us on

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, गरीब कुटुंबातून पुढे आलेला सूरज चव्हाण आता घराघरात लोकप्रिय झाला आहे. आपल्या अनोख्या स्टाइलमुळे रील्सद्वारे प्रकाशझोतात आलेला हा सूरज आता ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता ठरला आहे. रविवारी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण यांच्यात अखेरची चुरस रंगली होती. त्यात सूरजने बाजी मारली. विजेतेपद घोषित होताच सोशल मीडियाद्वारे सूरजवर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. कलाविश्वातील विविध कलाकार आणि त्याचसोबत राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनीही सूरजचं तोंडभरून कौतुक केलंय. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये निवड होत अखेर विजयी होणं सोपं नाही, असं त्यांनी म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट-

‘आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून 3 वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा.. की नीवद ( नैवद्य ) नारळ आलेत का माझ्या पुढं.. ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा.. आपली भूक भागवायचा.. सुप्रसिद्ध रिल्सस्टार सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला. अखेर त्याने मानाची ट्रॉफी आपल्या पदरात पाडून घेतली. बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच देशभर सूरजची क्रेझ वाढली होती आणि आता अधिकच वाढली आहे. बिग बॉससारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड होत अखेर विजयी होणं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जिंकलंस भावा… तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे’, अशी पोस्ट आव्हाड यांनी लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यातील बारामती तालुक्यातील मुडवे हे सूरजचं गाव आहे. त्याचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. सूरज 10 वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. या धक्क्यातून सावरू न शकलेली आई आजारी पडली आणि याच आजारपणातून तिचं निधन झालं. आई-वडिलांच्या निधनानंतर सूरज आणि त्याच्या बहिणी असा कुटुंब होता. अशा परिस्थितीत भावंडांनी एकमेकांना आधार दिला. घरच्या बिकट परिस्थितीमुळे सूरजला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं. त्यानंतर हाती मिळेल ते काम करून तो पैसे कमावू लागला. मात्र टिकटॉकमुळे सूरजच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं.