कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं

| Updated on: Sep 30, 2024 | 3:38 PM

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र देण्यात अडथळे येत असल्याने निर्मिती संस्थेनं कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर कोर्टाने उत्तर मागितल्यावर सेन्सॉर बोर्डाच्या समितीने काही कट्स सुचवले आहेत.

कंगना यांच्या इमर्जन्सी चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं
कंगना राणौत यांचा 'इमर्जन्सी'
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री कंगना राणौत यांनी त्यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात आम्ही सुचवलेले बदल आणि काटछाट करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती सेन्सॉर बोर्डाने आज (30 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात दिली. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये कंगना यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली असून त्या या चित्रपटाच्या सहनिर्मात्यासुद्धा आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद सुरू आहे. सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळत नसल्याने निर्मात्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही कट्स आणि बदल सुचवले असून आता त्याला कंगना यांनी सहमती दर्शवली आहे. सीबीएफसीचं प्रतिनिधित्व करणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर हे स्पष्ट केलं.

शीख संघटनांनी कंगना राणौत यांच्या या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात शीख संघटनांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं असून या समुदायाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वादानंतर ‘इमर्जन्सी’च्या निर्मात्यांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कंगना यांनी सेन्सॉर बोर्डासोबत बैठक घेतली आणि चित्रपटात काही सीन्स कट्स करण्यासंदर्भातील आणि काही बदल करण्यासंदर्भातील सूचनांना सहमती दर्शवली, असं त्यांनी न्यायालयात म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

सेन्सॉर बोर्डाने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात एकूण 13 बदल सुचवले आहेत. यामध्ये 6 गोष्टींचा समावेश, 4 गोष्टी वगळ्यास आणि 3 बदल सुचवण्यात आले आहेत. कंगना यांनी याआधी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, “मी माझ्या चित्रपटात कोणतेच बदल करणार नाही. तो चित्रपट जसा बनवला आहे तसाच प्रदर्शित करेन.” पण आता सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात अडथळे येत असल्याने अखेर त्यांनी त्यात बदल करण्यास सहमती दर्शवली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या समितीने म्हटलंय की या चित्रपटात महिलांवरील अत्याचाराचा संदर्भ, राजकीय हिंसाचार आणि अशांतता दर्शविणारी काही दृश्ये आहेत. त्यामुळे समितीने हा चित्रपट 12 वर्षांखालील मुलांसाठी पालकांच्या मार्गदर्शनासह पाहण्यासाठी योग्य असल्याचं म्हटलंय.

सीबीएफसीकडून सुचवण्यात आलेले काही बदल-

  • चित्रपटात शीख समुदायाबद्दल केलेल्या चित्रणाबाबत शीख गटांनी उपस्थित केलेल्या चिंतेचा विचार सेन्सॉर बोर्डाच्या समितीने केला.
  • सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटाच्या सुरुवातीला ‘डिस्क्लेमर’ ठेवण्याची विनंती केली. हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित आहे आणि त्यात काही नाट्यमय परिवर्तन करण्यात आले आहेत, अशा आशयाचं डिस्क्लेमर ठेवण्याची विनंती केली.
  • सेन्सॉर बोर्डाने संजय गांधी आणि गियानी झैल सिंह यांच्यातील एका विशिष्ट संवादातून ‘संत’ आणि ‘भिंद्रनवाले’ हे शब्द काढून टाकण्याची शिफारस केली आहे.
  • माजी पंतप्रधान आणि भारतीय लष्करातील उच्चपदस्थ यांच्यातील संवाद हटविण्याची मागणी बोर्डाने केली.
  • तसंच चित्रपट निर्मात्यांना शीख अतिरेकी जर्नल सिंग भिंद्रनवाले यांचं कौतुक केलं जाणारं वाक्य हटविण्यास सांगितलं. निर्मात्यांना अशी दृश्ये आणि संवाद काढून टाकण्यास सांगितलं गेलंय, जे बिगर-शीखांना लक्ष्य करतात.
  • सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना ‘खलिस्तान’चा संदर्भ देणारा संवाद आणि शिखांचं चित्रण केलेल्या काही दृश्यांना सौम्य करण्यास सांगितलं आहे.
  • सेन्सॉर बोर्डाने असंही सुचवलंय की निर्मात्यांनी चित्रपटात जिथे जिथे वास्तविक फुटेज वापरले आहेत, तिथे मजकुराच्या स्वरुपात ‘रिअल फुटेज’ म्हणून उल्लेख करावा.
  • बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटात नमूद केलेली सर्व आकडेवारी, विधानं आणि संदर्भांचा कागदोपत्री पुरावा सादर करण्यासही सांगितलंय.