ब्रेकअपनंतर 17 वर्षांनी शाहिद कपूरविषयी करीना झाली व्यक्त; म्हणाली “त्याच्याशिवाय..”

| Updated on: Sep 22, 2024 | 9:06 AM

करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचं जवळपास 17 वर्षांपूर्वी ब्रेकअप झालं होतं. 'जब वी मेट' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. आता 17 वर्षांनंतर करीना पहिल्यांदाच शाहिदविषयी व्यक्त झाली.

ब्रेकअपनंतर 17 वर्षांनी शाहिद कपूरविषयी करीना झाली व्यक्त; म्हणाली त्याच्याशिवाय..
Kareena Kapoor and Shahid Kapoor
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचं नातं इंडस्ट्रीत बरीच वर्षे चर्चेत होतं. जेवढी चर्चा त्यांच्या नात्याची झाली, तेवढीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपचीही झाली. 17 वर्षांपूर्वी या दोघांचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. इतकंच नव्हे तर आता 17 वर्षांनंतरही या चित्रपटाची प्रेक्षकांमधील क्रेझ कायम आहे. यामध्ये शाहिदने आदित्यची आणि करीनाने गीतची भूमिका साकारली होती. ब्रेकअपनंतर शाहिद आणि करीना यांनी एकमेकांसमोर येणं टाळलं होतं. कार्यक्रमांमध्ये जरी योगायोगाने दोघं एकमेकांसमोर आले, तरीही त्यांनी कधीच संवाद साधला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच शाहिदविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. शाहिद कपूरशिवाय गीतची भूमिका इतकी गाजू शकली नसली, असं तिने म्हटलंय.

‘ब्रुट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत करीनाला ‘जब वी मेट’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारण्यात आला. या चित्रपटाविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी तिला सर्वाधिक कोणती गोष्ट आवडली, असा सवाल करीनाला करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सर्वकाही.. मी तुम्हाला सांगते की मला सर्वकाही आवडलं. गीत ही सर्वार्थाने भारतीय अभिनेत्री आहे. त्या भूमिकेची प्रत्येक गोष्ट मला आवडली. प्रत्येकाला गीतसारखं आयुष्य हवं असतं, तिच्यासारखं वागायचं असतं. आजही जेव्हा मी हा चित्रपट पाहते, तेव्हा मला ते खूप खास वाटतं.”

हे सुद्धा वाचा

“गीतची भूमिका आदित्यपेक्षा प्रचंड विरोधातली होती. मी याठिकाणी शाहिदचे नक्कीच आभार मानू इच्छिते. कारण त्याने या चित्रपटात अप्रतिम काम केलंय. आम्हा दोघांची ऊर्जा त्या भूमिकांसाठी पूरक ठरली. त्याच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता”, असं ती पुढे म्हणाली. ‘जब वी मेट’ हा चित्रपट ऑक्टोबर 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 50.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. हिंदीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचं तमिळ आणि तेलुगूमध्येही डबिंग करण्यात आलं होतं.

‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच शाहिद आणि करीनाच्या नात्यात फूट पडली होती. ब्रेकअपनंतर त्यांनी 2016 मध्ये ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या ब्रेकअपविषयी ‘जब वी मेट’चा दिग्दर्शक इम्तियाज अली एका मुलाखतीत म्हणाला होता, “माझ्या चित्रपटाचं शूटिंग अखेरच्या टप्प्यात असताना त्या दोघांचा ब्रेकअप झाला. चित्रपटाचं बऱ्याच अंशी शूटिंग झालं होतं. त्यांच्या ब्रेकअपनंतर अवघ्या दोन दिवसांचं शूटिंग बाकी होतं. पण तरीही त्यांच्या ब्रेकअपचा कामावर अजिबात परिणाम झाला नव्हता. दोघंही खूप प्रोफेशनल आहेत. त्यांच्या खासगी आयुष्यात जे काही घडलं होतं, त्याचे कोणतेच पडसाद सेटवर उमटले नव्हते.”