दंगल भडकेल म्हणत या राज्याने घातली ‘हमारे बारह’ चित्रपटावर बंदी

| Updated on: Jun 07, 2024 | 5:22 PM

हा चित्रपट प्रदर्शित करण्याविरोधात त्यातील कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अनु कपूर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू मांडली होती.

दंगल भडकेल म्हणत या राज्याने घातली हमारे बारह चित्रपटावर बंदी
'हमारे बारह' या चित्रपटाचं पोस्टर
Image Credit source: Instagram
Follow us on

कर्नाटक सरकारने ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दोन आठवड्यांपर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत राज्यात बंदी घातली आहे. हा निर्णय कर्नाटक सिनेमा नियमन कायदा 1964, कलम 15 (1) आणि 15 (5) नुसार घेण्यात आला आहे. ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राज्यात जातीय तेढ निर्माण होईल, असा आरोप कर्नाटक सरकारने केला आहे. अनेक अल्पसंख्याक संघटना आणि शिष्टमंडलांच्या विनंतीचा विचार करून आणि चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतरच अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. अनु कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आज (7 जून) देशभरात प्रदर्शित झाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात अनु कपूर, मनोज जोशी आणि पारितोष त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाचं प्रदर्शन रोखल्याने निर्मात्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण त्यांनी या चित्रपटाच्या प्रॉडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये बराच पैसा गुंतवला आहे. एका विशिष्ट धार्मिक समुदायाच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हा कायदेशीर अडथळा निर्माण झाला आहे.

‘हमारे बारह’ या चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटात मंजूर अली खान संजारी या पुरुषाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू बाळाच्या जन्मादरम्यान होतो. त्यानंतर दुसऱ्या पत्नीपासून त्याला अधिकाधिक मुलांची अपेक्षा असते. सहाव्या वेळी गरोदर असताना तिच्या जीवाला धोका असल्याचा इशारा डॉक्टर देतात. मात्र तरीही खान त्याच्या पत्नीच्या गर्भपाताला नकार देतो. तेव्हा सावत्र आईला वाचवण्याचा निर्धार त्याची मुलगी अल्फिया करते. आईच्या गर्भपाताच्या मागणीसाठी ती वडिलांना कोर्टात खेचते.

हे सुद्धा वाचा

कलाकारांना धमक्या

या चित्रपटात अनु कपूर, मनोज जोशी आणि पारितोष त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये महिलांच्या वेदनांचं धाडसी कथन केल्याचं पहायला मिळालं. यामध्ये वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा मांडण्यात आला असून त्यामुळे महिलांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे दाखवण्यात आलं होतं. मात्र हाच टीझर काहींना खटकला असून चित्रपटाच्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.