फक्त वॉशरुमसाठी 200 रुपये..; भूस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली ‘चंद्रमुखी चौटाला’

| Updated on: Jul 14, 2024 | 9:16 AM

'एफआयआर' या मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता कौशिक ही गेल्या चार दिवसांपासून बद्रीनाथमध्ये अडकली आहे. चमोली जिल्ह्यात भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.

फक्त वॉशरुमसाठी 200 रुपये..; भूस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली चंद्रमुखी चौटाला
Kavita Kaushik
Image Credit source: Instagram
Follow us on

जोशीमठच्या डोंगरावरून भूस्खलन झाल्याने उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. महामार्गावर मोठमोठे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक पर्यटक त्याठिकाणी अडकले आहेत. ‘एफआयआर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कविता कौशिकसुद्धा तिचा पती रोनित आणि पाळीव श्वानासोबत बद्रिनाथमध्ये अडकली आहे. गेल्या चार दिवसांपासून ती जोशीमठ इथल्या आर्मी कॅम्पमध्ये राहतेय. “महामार्गावर हजारांपेक्षा जास्त गाड्या अडकल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी किती लोकं अडकली आहेत, याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. पोलीस, सैन्यदल आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे सातत्याने रस्ता मोकळा करण्यासाठी काम करत आहेत. पण रस्त्याचा एक भाग मोकळा केला की दुसऱ्या भागावर दरड कोसळतेय. त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत भयंकर आहे”, अशी माहिती कविताने ‘ई टाइम्स’शी बोलताना दिली.

कविता कौशिक तिच्या वाढदिवसानिमित्त पती रोनित बिस्वास, पाळीव श्वान आणि चुलत भावासोबत बद्रीनाथला देवदर्शनासाठी गेली होती. देहरादूनपासून बद्रीनाथपर्यंत त्यांनी सुरळीत प्रवास केला आणि देवदर्शनही केलं. मात्र तिथून परतताना बद्रीनाश महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे चार दिवसांपासून ते तिथेच अडकले आहेत. बद्रीनाथजवळच असलेल्या माना गावात कविता कौशिक तीन दिवस अडकली होती.

हे सुद्धा वाचा

याविषयी ती म्हणाली, “8 जुलै रोजी रस्ता साफ झाल्यानंतर आम्ही जोशीमठला पोहोचलो. पण जोशीमठला पोहोचताच आम्हाला समजलं की दोन मोठे दरड महामार्गावर कोसळले आहेत. त्यामुळे संपूर्ण महामार्ग ब्लॉक झाला होता. आता आम्ही जोशीमठ याठिकाणी आर्मी कॅम्पमध्ये राहतोय. माझ्या पतीचे मित्र आर्मी ऑफिसर आहेत. ते आमची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. मात्र आमच्यासारखेच इतरही बरेच जण इथे अडकले आहेत.”

एकीकडे भूस्खलनामुळे अनेक पर्यटक याठिकाणी अडकले असताना हॉटेलवाले त्यांच्याकडून पैसे लुटत असल्याचा अनुभवही कविताने सांगितला. “इथे रेस्टॉरंट आणि हॉटेलवाले फक्त वॉशरुम वापरण्यासाठी 200 रुपये घेत आहेत. सैन्यातील लोकांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी तिथे जाऊन हॉटेलवाल्यांना पर्यटकांची मदत करण्यास सांगितलं. गेल्या चार दिवसांपासून आम्ही इथे अडकलोय आणि आता मी खरंच वैतागली आहे”, असं ती पुढे म्हणाली.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, चमोली याठिकाणी मोठमोठे दरड कोसळल्याने बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रवासी अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे चंपावत आणि उधमसिंग नगर जिल्ह्यातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत.