KBC 15 Winner | कपड्यांच्या दुकानापासून ते करोडपती बनण्यापर्यंतचा जसलीनचा प्रेरणादायी प्रवास

| Updated on: Sep 25, 2023 | 12:13 PM

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बरेच स्पर्धक आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात. यापैकी काहींना अपयश मिळतं तर काहींचं नशीब चमकतं. जसलीन कुमारने नुकतेच या शोमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र करोडपती बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता.

KBC 15 Winner | कपड्यांच्या दुकानापासून ते करोडपती बनण्यापर्यंतचा जसलीनचा प्रेरणादायी प्रवास
केबीसी 15 चा विजेता जसलीन कुमार
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये येणाऱ्या असंख्य स्पर्धकांचं स्वप्न साकार होतं. आपल्या ज्ञानाच्या जोरावर जिंकलेल्या रकमेनं काहींना हक्काचं घर घेता येतं, तर काहींना कर्ज फेडता येतं. काहीजण बक्षिसाच्या रकमेनं उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात. म्हणूनच केबीसीमध्ये प्रत्येकजण आशेचा किरण सोबत घेऊन येतो. यावेळी जसनील कुमार या स्पर्धकाने एक कोटी रुपये आपल्या नावे केले. एक कोटी रुपये जिंकणारा तो या सिझनमधील दुसरा स्पर्धक ठरला. एक कोटीनंतर जसनीलला सात कोटी रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला. त्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं, मात्र त्याबद्दल पूर्ण खात्री नसल्याने त्याने खेळ सोडला. नंतर तेच उत्तर योग्य असल्याचं समजलं. जसनीलचा हॉटसीटपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता.

जसनील हा आजमगढचा असून तिथे तो एका कपड्यांच्या शोरुममध्ये काम करतो. नोकरी करता करता तो केबीसीच्या हॉटसीटवर येण्यासाठी सतत प्रयत्न करत असायचा. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी तो गेल्या बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होता. एका मुलाखतीत जसनीलने सांगितलं होतं की, ‘केबीसी’मध्ये मोठा विजय मिळवण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो बऱ्याच वर्षांपासून तयारी करत होता. त्याचसोबत त्याने असंही म्हटलंय की अमिताभ बच्चन यांनी दिलेला जॅकेट त्याच्यासाठी ‘लकी’ ठरला.

शूटिंगदरम्यान एसीमुळे जसनील कुमारला खूप थंडी वाजत होती. त्यावेळी सूत्रसंचालक बिग बींनी आपला जॅकेट मागवला आणि तो जसनीलला दिला. त्यानेही अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद मानत तो जॅकेट स्वीकारला आणि तोच आपल्यासाठी ‘लकी चार्म’ ठरल्याचं म्हटलं. “माझ्यासाठी ते क्षण खूप स्वप्नवत होते. जेव्हा त्यांनी मला त्यांचा जॅकेट दिला, तेव्हा मला फारस सकारात्मक वाटलं. मी त्यांच्या विनम्र स्वभावाला कधीच विसरू शकत नाही. खेळ संपल्यानंतर त्यांनी मला मिठी मारली आणि म्हटलं ‘बहुत अच्छा’. आयुष्यात असे क्षण एकदाच अनुभवायला मिळतात”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

अनेक स्पर्धकांचं असं म्हणणं असतं की केबीसीमध्ये जेव्हा बिग बी समोर येतात, तेव्हा त्यांच्यावर खूप दडपण येतं. मात्र जसनीलसाठी बिग बींना भेटणं म्हणजे जणू बोनसच होतं. “अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक आहेत आणि त्यांना पाहूनच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे त्यांना भेटणं ही फार सन्मानाची बाब आहे. मला माझ्या ज्ञानावर खूप विश्वास होता. त्यामुळे मी त्यांच्यासमोर घाबरलो नाही. सुरुवातीला थोडं दडपण नक्कीच आलं होतं. पण माझं नाव करोडपतीच्या रुपात घोषित केलं जावं अशी माझी खूप इच्छा होती. त्या क्षणाची कल्पना अनेकदा मी स्वप्नात केली होती. माझ्यासाठी इथपर्यंतचा प्रवास म्हणजे एक तपस्या आहे”, अशा शब्दांत जसनीलने भावना व्यक्त केल्या.