‘मोदींना पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा..’; शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी किरण मानेंची मार्मिक पोस्ट

| Updated on: Aug 28, 2024 | 11:30 AM

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. मात्र सोमवारी दुपारी एकच्या सुमारास हा पुतळा कोसळला. याप्रकरणी अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

मोदींना पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा..; शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी किरण मानेंची मार्मिक पोस्ट
शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी किरण मानेंची पोस्ट
Image Credit source: Facebook
Follow us on

मालिका आणि नाटकात काम करणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी फेसबुकवर लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. मालवणमधील शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नौदल दिनानिमित्त गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्ये या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. ‘त्यांना टीकाकार ‘पनौती’ वगैरे म्हणतात. ते मला अजिबात आवडत नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे,’ असं किरण माने यांनी लिहिलंय.

किरण माने यांची पोस्ट-

‘खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा! पुतळा एवढा जुनाही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता. मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपूर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चार पाच महिने आधी. राममंदिराच्या दीड महिना आधी. त्यानंतर फक्त 266 दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते.

यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली, पुल कोसळताना पाहिले, पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या, बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले, रस्ते खचलेले पाहिले, राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला, नवीन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला, नवीन संसद इमारतीत गळती लागून बादल्या ठेवाव्या लागल्याचे लाजीरवाणे दृश्य पाहिले. जगापुढे शरमेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली.

हे सुद्धा वाचा

त्यांना टीकाकार ‘पनौती’ वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पूल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नॉलॉजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय?

‘भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.’ बस्स.

दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्‍यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे. अजून तरी होय जागा… तुका म्हणे पुढे दगा,’

छत्रपती शिवाजी महाराज यांचं आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या वर्षीचा नौदल दिन मालवण इथं साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्तानेच मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. 15 फूट उंचीचा चबुतरा आणि 28 फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी रचना होती.