घटस्फोटानंतर अरबाजसोबत मिळून मुलाचं संगोपन करण्यात आली अडचण? मलायका म्हणते..

| Updated on: Jun 28, 2024 | 11:29 AM

लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दोघं मिळून मुलाचं संगोपन करत आहेत. यावेळी कोणत्या अडचणी आल्या, याविषयी मलायका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

घटस्फोटानंतर अरबाजसोबत मिळून मुलाचं संगोपन करण्यात आली अडचण? मलायका म्हणते..
मलायका अरोरा, अरबाज खान आणि अरहान खान
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. घटस्फोटानंतर मुलगा अरहान खानचं संगोपन दोघं मिळून करत आहेत. मुलाखातर अनेकदा हे दोघं एकत्र दिसले. शिक्षणासाठी त्याला परदेशी पाठवतानाही एअरपोर्टवर मलायका आणि अरबाज एकत्र दिसायचे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर अरहानचं संगोपन करण्यात कोणती आव्हानं आली, याविषयी तिने सांगितलं. घटस्फोटानंतर सुरुवातीला ही संपूर्ण प्रक्रिया थोडी क्लिष्ट होती, मात्र हळूहळू सर्व गोष्टी सहज होत गेल्या, असं मलायका म्हणाली.

‘हॅलो मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत मुलाच्या संगोपनाविषयी मलायका म्हणाली, “जे काही झालं ते उत्तमच झालं. सुदैवाने आता आमच्या नात्यात बरंच संतुलन आहे. मात्र सुरुवातीला हे सर्व थोडं अवघड होतं आणि ते असणं स्वाभाविक आहे. कारण आयुष्य हे असंच असतं. आम्हा दोघांनाही ही गोष्ट माहित होती की इतर कोणत्याही गोष्टींना न जुमानता आणि दोन मोठ्या लोकांमध्ये जे घडलंय त्या गोष्टी लक्षात घेता, त्याचा मुलावर कधीच परिणाम होऊ नये. यातूनच आम्ही सह पालकत्वाचा अनुकूल मार्ग शोधून काढला आहे.”

हे सुद्धा वाचा

“यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरहानच्या मनात इतरांबद्दल आदर सतत असायला हवा आणि त्याच्याकडे असलेल्या विशेषाधिकारांवर विसंबून न राहता स्वत: गोष्टी करण्यास सक्षम असण्याची भावना त्याच्या मनात निर्माण व्हावी अशी माझी इच्छा होती. आम्ही त्याला नेहमी हेच सांगत आलोय की त्याला मेहनत करून पुढे यावं लागेल. यात तो धडपडला तर आम्ही त्याच्या पाठिशी आहोतच. पण विचार, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या त्याने स्वतंत्र राहावं. ज्या मुलांना जन्मत:च विशेषाधिकार मिळतात, त्यांना असं वाटतं की माझे पालक सर्वकाही सांभाळून घेतील. पण अरहानला सर्व स्वत:हून कमवावं लागेल, हे आम्ही शिकवलंय”, असं मलायकाने पुढे सांगितलं.

अरहानने यावर्षी एप्रिल महिन्यात त्याचा वॉडकास्ट (व्हिडीओ पॉडकास्ट) सुरू केला. ‘डंब बिर्याणी’ असं त्याच्या वॉडकास्टचं नाव असून यात त्याचे वडील अरबाज खान आणि आई मलायका अरोरासुद्धा पाहुणे म्हणून उपस्थित होते. अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2016 मध्ये मलायका आणि अरबाज विभक्त झाले. 2017 मध्ये त्यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर गेल्या वर्षी अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केलं. तर मलायका गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.