सर्वकाही सेक्ससाठी, फक्त अभिनेत्रीच नाही, तर…मॉलिवूडचा डर्टी पिक्चर

| Updated on: Sep 02, 2024 | 11:20 AM

काही वर्षांपूर्वी MeToo मोहीम सुरु झाली होती. हॉलिवूडपासून सुरु झालेल्या या मोहीमेचे पडसाद बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातही उमटले. अनेकांचे बुरखे यामुळे फाटले. महिलांना कशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. त्यांचा कसा लैंगिक छळ झाला ते समोर आलं. आता जस्टीस हेमा कमिटीच्या रिपोर्टमुळे भारतातील एका मोठ्या चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. मॉलिवूड म्हणजे मल्याळम चित्रपट सृष्टीत हे सर्व घडतय. फक्त अभिनेत्रीच नाही, तर मॉलिवूडमध्ये अन्य महिलांचा कसा छळ होतो? ते समोर आलय.

सर्वकाही सेक्ससाठी, फक्त अभिनेत्रीच नाही, तर...मॉलिवूडचा डर्टी पिक्चर
Malayalam film industry Hema Committee report
Follow us on

चित्रपट सृष्टी बाहेरुन कितीही आकर्षक वाटत असली, तरी आतून पोकळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. चित्रपट सृष्टीत मिळणारा पैसा, प्रसिद्धीने डोळे दिपून जातात. चित्रपटाच्या या झगमगत्या दुनियेत आपलं नाव व्हावं, अशी अनेक युवक-युवतींची इच्छा असते. इथे यश मिळवणाऱ्यांपेक्षा अपयशी होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. स्ट्रगल इथे कोणालाही चुकलेला नाही. सर्वात मोठ्या स्टारला सुद्धा खडतर, कठीण काळ पहावा लागतो. दरदिवशी पोटापाण्यासाठी लाखो लोक मुंबईत येतात. यात चित्रपट सृष्टीत नाव कमावण्यासाठी आलेल्यांची संख्याही कमी नसते. दूरच्या गावातून, शहरातून चित्रपटांच विश्व खूप सुंदर भासतं. मोहात पाडतं, पण मुंबईत आल्यानंतर वास्तव लक्षात येतं. चित्रपट सृष्टीच्या ग्लॅमरमागची दुनिया किती दिखावटी, बनावटी आहे ते समजतं. ते चटके आयुष्यभराचे धडे देऊन जातात. लाखोंमध्ये एखादाच स्टार होतो किंवा होते. चित्रपटात करियर करण्यासाठी आलेले अनेक जण कुठे गायब होऊन जातात? हे कळतही नाही. चित्रपटामागची ही जी दुनिया आहे, त्यावर आतापर्यंत अनेक फिल्मस, वेब सीरीज आल्यात. वास्तव माहित असतं, पण, तरी ही या रंगीन, मायावी दुनियेच आकर्षण अजिबात कमी झालेलं नाही.

सध्या देशात मॉलिवूड म्हणजे मल्याळम चित्रपट सृष्टीची चर्चा आहे. जस्टीस हेमा कमिटीच्या रिपोर्ट्मुळे मल्याळम चित्रपट सृष्टीचा डर्टी पिक्चर समोर आलाय. “आकाश हे रहस्यांनी भरलेलं आहे. तारे चमकतात, चंद्र सुंदर आहे असं म्हणतात. पण वैज्ञानिक चाचणीतून जे समोर आलं, त्यानुसार ना, तारे चमकतात, ना चंद्र सुंदर आहे” जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टच्या सुरुवातीच्या ओळींमधूनच मल्याळम चित्रपट सृष्टीची काळी बाजू समोर येते. हेमा कमिटीचा रिपोर्ट आता समोर आला असला, तरी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना ह रिपोर्ट पाच वर्षांपूर्वी सोपवला होता. 19 ऑगस्टला हा रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर दररोज मल्याळम चित्रपट सृष्टीतील धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. मॉलिवूडमध्ये महिलांना कशा प्रकारे लैंगिक छळाला सामोर जावं लागतं, लॉबिंग, ठराविक लोकांच्या हातात असलेलं नियंत्रण यावर हेमा कमिटीच्या रिपोर्टमुळे प्रकाश पडला आहे.

अभिनेत्रीच्या अपहरणाने या सगळ्याला सुरुवात

फेब्रुवारी 2017 मध्ये प्रसिद्ध मल्याळी अभिनेत्रीच अपहरण करण्यात आलं. धावत्या कारमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं. या सगळ्या घटनेची क्लिप बनवण्यात आली. या अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या या प्रकाराची पोलिसात तक्रार नोंदवली. आरोपींमध्ये प्रसिद्ध मल्याळी अभिनेता दिलीपचही नाव होतं. फक्त मल्याळीच नाही, तर तामिळ, कन्नड चित्रपटातही त्याने अभिनय केलाय. दिलीप हे मल्याळी चित्रपट सृष्टीतील खूप मोठ नाव आहे. त्याने संबंधित अभिनेत्रीला धडा शिकवण्यासाठी म्हणून असं कृत्य केलं होतं. या अभिनेत्रीसोबत जे घडलं, त्याचा खटला अजूनही सुरु आहे. या प्रकरणात अनेक साक्षीदार उलटले.

मल्याळम चित्रपट सृष्टीची काळीबाजू

मल्याळी अभिनेत्रीसोबत जे घडलं, त्यानंतर (WCC) वूमेन इन सिनेमा कलेक्टिवची स्थापना झाली. मल्याळम चित्रपट सृष्टीतील 10 महिलांनी मिळून हा ग्रुप स्थापन केला. यात मंजू वॉरियर, पार्वथी, रिमा काल्लिंगल, रेम्या नामबीसान आणि अन्य महिला होत्या. मॉलिवूडमध्ये सुधारणा आणि महिलांसाठी काम करण्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित ठिकाण बनवणं हा WCC च्या निर्मितीमागे उद्देश होता. मल्याळम चित्रपट सृष्टीत जे घडलं, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संताप होता. अखेर नोव्हेंबर 2017 मध्ये राज्य सरकारने हेमा समितीची स्थापना केली. यात न्यामूर्ती हेमा, अभिनत्री सारादा आणि नोकरशाह केबी वालसाला कुमारी यांचा समावेश होता. या समितीने महिलांना पुढे येऊन बोलण्याच आवाहन केलं. नाव गोपनीय ठेवण्याचा शब्द दिला. 80 पेक्षा जास्त महिलांनी हेमा कमिटीसमोर साक्ष नोंदवली. मल्याळम चित्रपट सृष्टीची काळीबाजू त्यांनी समोर आणली.

रिपोर्ट का बाहेर येऊ दिला नाही?

2019 साली कमिटीने 296 पानांचा रिपोर्ट केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे सोपवला. हा अहवाल बाहेर आला, तर मोठा गदारोळ होणार याची कल्पना होती. त्यामुळे सरकारने हा रिपोर्ट बाहेर येऊ दिला नाही. सरकारच्या या कृतीवर बरीच टीका झाली. मोठ्या लोकांचा सरकार बचाव करतय, असा आरोपही झाला. अखेर 19 ऑगस्टला हेमा कमिटीच्या रिपोर्टच सत्य समोर आलं. काही ठिकाणी या रिपोर्टमध्ये महिलांऐवजी तरुणी म्हटलय. त्यामुळे अल्पवयीन मुलींचाही लैंगिक छळ झाल्याची शक्यता आहे.

लॉबीमध्ये टॉपचे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि टेक्निशियन्स

महिलांना शूटिंगच्या स्थळावर चेंजिंग रुम, प्रसाधनगृह या मुलभूत सुविधा मिळत नाहीत याचा उल्लेख रिपोर्टमध्ये आहेच. पण सर्वांना हादरवून सोडलय ते इंडस्ट्रीमध्ये महिलांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांनी. मॉलिवूडमधील पावरफुल लॉबी कशा प्रकारे शोषण करते ते सुद्धा या रिपोर्ट्मधून अधोरेखित झालय. या लॉबीमध्ये टॉपचे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि टेक्निशियन्स आहेत.

दारू पिऊन महिला अभिनेत्रीच्या दारावर धडकतात

मॉलिवूडमध्ये अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दारू पिऊन महिला अभिनेत्रीच्या दारावर कसे धडकतात, सेक्सच्या मागणीसाठी कशा पद्धतीने दरवाजे ठोठावतात, त्या विषयी हेमा कमिटीच्या रिपोर्टमध्ये स्वतंत्र भाग आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीत शूटिंगच्या स्थळांवर महिलांवर सेक्ससाठी जबरदस्ती केली जाते, अन्यथा माफीयाकडून त्यांचा कसा छळ होतो? त्यांना कसा त्रास दिला जातो? या बद्दल रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

‘डायरेक्टरने तिला 17 वेळा किसींग सीन करायला लावला’

मॉलिवूडमधील पावरफुल लॉबी आपल्याविरुद्ध कोणी बोलणार नाही, याची पुरेपूर काळजी घेते. “माफीया जर एखाद्या अभिनेत्रीवर नाराज झाला, तर त्या अभिनेत्रीला सेटवर वारंवार इंटिमेट सीन करायला भाग पाडून मानसिक त्रास दिला जातो. एकदा एका अभिनेत्रीने तक्रार केल्यानंतर डायरेक्टरने तिला 17 वेळा किसींग सीन करायला लावला” असं या रिपोर्टमध्ये म्हटलय.

अभिनेत्रीकडून बलात्कारचा आरोप

या मानसिक, शारीरिक त्रासापलीकडे महिलांना पुरुषांच्या तुलनेत कामाचे कमी पैसे मिळतात. हेमा कमिटीची रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर दोन अभिनेत्री समोर आल्या. त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. मल्याळम चित्रपट सृष्टीतील मोठं नाव असलेल्या सिद्दीकीवर एका अभिनेत्रीने बलात्कार आणि त्रास दिल्याचा आरोप केलाय. या आरोपानंतर सिद्दीकीने एसोसिएशन ऑफ मलयालम मूवी आर्टिस्ट्स सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शकावर आरोप

अलीकडे बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्राने मल्याळी दिग्दर्शक रणजीतवर असाच आरोप केला आहे. रणजीतच्या अयोग्य वर्तनाने आपल्याला अस्वस्थ केलं होतं, असं श्रीलेखाने म्हटलेलं. या आरोपानंतर रणजती केरळ चलचित्र अकादमीच्या प्रमुख पदावरुन पायउतार झाला. अभिनेत्री मिनू मुनीरने सुद्धा फेसबुक पोस्टमधून मुकेश, मनियांपिल्ला राजू, इडवेला बाबू आणि जयसूर्या यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. 2013 साली चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेबद्दल तिने भाष्य केलय.

कारवाई कधी होणार?

सिद्दीकी आणि रणजीत ही मल्याळी चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नावं आहेत. आरोपांनंतर दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ‘अम्मा’ ही मल्याळी चित्रपट कलाकारांची संघटना आहे. त्यांनी हेमा कमिटीच्या रिपोर्टवर कठोर भूमिका घेतलेली नाही. अजून पूर्ण रिपोर्ट वाचायचा आहे, असं म्हटलय. पीडित महिला लिखित तक्रार करत नाहीत, तो पर्यंत कारवाई करणार नाही असं सरकारने म्हटलय.

मोहनलाल काय म्हणाले?

हेमा कमिटीचा रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांना ‘अम्मा’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून मोहनलाल मौन बाळगून होते. मोहनलाल हे फक्त मॉलिवूडच नव्हे, तर बॉलिवूडमधलं सुद्धा मोठ नाव आहे. मोहनलाल आता या विषयावर बोलले आहेत. “हेमा कमिटीच्या रिपोर्ट्च स्वागत झालं पाहिजे. मी दोनवेळा या कमिटीसमोर गेलोय. मी विनंती करतो, इंडस्ट्री उद्धवस्त करु नका. सरकारने रिपोर्ट जाहीर करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे”

“मी दोनवेळा ‘अम्मा’च अध्यक्षपद भूषवलं आहे. हेमा कमिटीच्या रिपोर्टवर उत्तर देणं, ही संपूर्ण मल्याळम चित्रपट सृष्टीची जबाबदारी आहे. अम्माला सर्व प्रश्न विचारले जात आहेत. अम्मा सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही. हे प्रश्न प्रत्येकाला विचारले पाहिजेत. इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक आहेत. प्रत्येकाला दोषी ठरवता येणार नाही. जबाबदार लोकांना शासन होईल” असं मोहनलाल म्हणाले.

प्रसिद्ध अभिनेत्री रेवती काय म्हणाल्या?

WCC च्या सदस्य आणि प्रसिद्ध अभिनेत्री रेवती यांनी सुद्धा त्यांचं मत मांडलं. “मी आनंदी आहे. पहिल्यांदा कुठल्यातरी राज्य सरकारमुळे हे शक्य झालय. भले थोडा विलंब झाला असेल पण हे घडलय. चित्रपटसृष्टी संदर्भात असा अभ्यास या आधी झाला नव्हता. त्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. पण अजून बरच पुढे जायच आहे. चित्रपट सृष्टी महिलांसाठी अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आता चित्रपट संघटनांना सरकारच्या हातात हात घालून काम करावं लागेल” असं रेवती म्हणाल्या. हेमा कमिटीसमोर साक्ष देताना महिलांनी मॉलिवूडमध्ये काही पुरुष चांगले असून महिलांना आदराने वागवतात असं सुद्धा म्हटलय.

सिद्दीकी-रणजीतची बाजू कोणी घेतली?

सिद्दीकी आणि रणजीत हे मॉलिवूडचे दोन मोठे चेहरे आज विलन वाटत असेल, तरी रेंजी पणिकर या मल्याळम अभिनेत्याने त्यांची बाजू घेतली आहे. “त्यांची कल्पकता तुम्ही दडपून टाकू शकत नाही. सबळ पुराव्यांशिवाय त्यांना चित्रपट सृष्टीतून बाजूला करणं अशक्य आहे” असं रेंजी पणिकरने म्हटलं आहे.