लग्नाची घाई नसताना नाग चैतन्यने साखरपुडा गडबडीत का उरकला? नागार्जुन यांनी दिलं कारण

| Updated on: Aug 10, 2024 | 10:50 AM

अभिनेता नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिताशी साखरपुडा केला. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. मात्र साखरपुड्यासाठी घाई का केली, याचं उत्तर त्याचे वडील नागार्जुन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिलं आहे.

लग्नाची घाई नसताना नाग चैतन्यने साखरपुडा गडबडीत का उरकला? नागार्जुन यांनी दिलं कारण
Nagarjuna and Naga Chaitanya with Sobhita
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. नाग चैतन्यचे वडील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनीच या साखरपुड्याचे फोटो सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी घाईत मुलाचा साखरपुडा का उरकला, यामागचं कारण सांगितलं आहे. नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असून याआधी त्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन यांना नाग चैतन्यच्या लग्नाच्या तारखेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते लगेच लग्न करणार नाहीत. आम्ही साखरपुड्यासाठी घाई केली, कारण तो दिवस खूपच चांगला होता. नाग चैतन्य आणि सोभिता हे दोघं लग्न करण्याबाबत ठाम होते, म्हणून आम्ही म्हटलं की साखरपुडा उरकून घेऊ.” या मुलाखतीत त्यांना होणाऱ्या सूनेबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना नागार्जुन पुढे म्हणाले, “तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण नाग चैतन्यच्याही आधीपासून मी तिला ओळखतो. होय. नाग चैतन्य तिला गेल्या दोन वर्षांपासून ओळखतो. पण मी तिला गेल्या सहा वर्षांपासून ओळखतो. मी तिचा ‘गुदाचारी’ हा चित्रपट पाहिला आणि मला तिचं काम खूप आवडलं होतं. हे मी तिलासुद्धा सांगितलं होतं. तेव्हापासून आम्ही अनेकदा चित्रपट, आयुष्या आणि इतर गोष्टींविषयी चर्चा केली. सोभिताला या गोष्टींचं बरंच ज्ञान आहे.”

हे सुद्धा वाचा

मुलाच्या साखरपुड्याविषयी त्यांनी सांगितलं, “कार्यक्रम खूप चांगल्याप्रकारे पार पडला. नाग चैतन्यला पुन्हा त्याचा आनंद मिळाला. तो खूप खुश आहे आणि त्याला पाहून मीसुद्धा खुश आहे. त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी मागचा काही काळ ठीक नव्हता. समंथासोबत विभक्त झाल्यानंतर तो खूप निराश झाला होता. माझा मुलगा दाखवत नाही, पण मला माहीत होतं की तो नाखुश आहे. सोभिता आणि त्याची जोडी चांगली आहे. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. साखरपुड्याला फक्त सोभिताचे आईवडील आणि बहीण, नाग चैतन्यची आई, माझी पत्नी अमला आणि मी उपस्थित होतो.”