सुशांतच्या निधनानंतर अशी होती रियाची अवस्था; सांगितला तुरुंगातील अनुभव

| Updated on: Sep 01, 2024 | 11:27 AM

रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या निधनानंतर रियावर ड्रग्ज पुरवल्याचा, पैसे उकळल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी ईडीकडून तिची चौकशी झाली. तर ड्रग्ज प्रकरणात तिला तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात बरेच दिवस राहिल्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली.

सुशांतच्या निधनानंतर अशी होती रियाची अवस्था; सांगितला तुरुंगातील अनुभव
Rhea Chakraborty and Sushant Singh Rajput
Follow us on

रिया चक्रवर्ती ही बॉलिवूडमधील सर्वांत वादग्रस्त अभिनेत्री आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रियावर गंभीर आरोप करण्यात आले होते. इतकंच नव्हे तर रियाला त्यासाठी तुरुंगातही जावं लागलं होतं. या घटनेच्या चार वर्षांनंतर रियाचं आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येतंय. तिने ‘चाप्टर 2’ या नावाने स्वत:चा पॉडकास्ट सुरू केला आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिया तिच्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे तुरुंगातील दिवस कसे होते, हा अनुभवही तिने सांगितला आहे. रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे 2020 मध्ये सुशांतच्या निधनानंतर रियावर बऱ्याच प्रश्नांचा भडीमार झाला होता. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत रिया म्हणाली की, ती खूप सकारात्मक मनोवृत्तीची होती आणि एक अभिनेत्री म्हणून तिला तिच्या कामाचा आनंद घ्यायचा होता. इतकंच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचं तिचं स्वप्न होतं, पण 2020 नंतर सर्वकाही बदलून गेलं.

“संपूर्ण देशातील लोक माझ्याबद्दल मत व्यक्त करतील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मग ते मत चांगलं असो किंवा वाईट हा वेगळा मुद्दा आहे. मी नंबर वन अभिनेत्री होईन असा कधी विचार केला नव्हता. पण त्याचसोबत माझ्या वाटेला लोकांचा जो काही द्वेष आणि राग आला, त्यालाही कधी सामोरं जाईन असं वाटलं नव्हतं. भविष्यात काय घडणार आहे, यासाठी कोणीच मला तयार केलं नव्हतं. ते मला चुडैल, काळी जादू करणार, नागिण असं काय काय म्हणायचे. पण आता मला त्याने फरक पडत नाही. आधी मला या गोष्टींमुळे खूप त्रास व्हायचा”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

रियाचा पोलिसांनी अनेकदा चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यादरम्यान सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. रिया जिथे कुठे जायची, तिथे तिच्या मागे फोटोग्राफर्सचा घोळका जायचा. या गोष्टींमुळे मला खूप राग यायचा आणि त्याचा परिणाम माझ्या आरोग्यावरही झाला, असं रियाने सांगितलंय. “जे काही घडलं, त्यासाठी मी कधीच कोणाला माफ करू शकेन असं वाटलं नव्हतं. पण माफ करणं हा सर्वांत सोपा मार्ग होता. मी बऱ्याच काळापर्यंत राग व्यक्त करत राहिले होतं. दुर्दैवाने त्या रागाचा माझ्याच आरोग्यावर परिणाम झाला. जवळपास तीन वर्षे मला पोटाच्या विकारांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे माफ करणं हाच एकमेव पर्याय माझ्यासमोर होता”, अशा शब्दांत रिया व्यक्त झाली.

याच मुलाखतीत रियाने तिच्या तुरुंगातील दिवसांचाही अनुभव सांगितला. “मला एक गोष्ट माहीत होती की तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मी तीच रिया नसेन. ते एक वेगळंच विश्व होतं आणि तिथे लोक फक्त त्यांना दिल्या गेलेल्या नंबरवरूनच ओळखले जायचे. तुरुंगातील एकेक दिवस एक वर्षाइतका मोठा वाटायचा. तिथे फक्त मला टिकून राहायचं होतं”, असंही ती म्हणाली.