सलमान खानला माफ करू शकतो बिष्णोई समाज; पण ठेवली एक मोठी अट

| Updated on: May 14, 2024 | 9:43 AM

अभिनेता सलमान खानला बिष्णोई समाज अखेर माफ करण्यासाठी तयार आहे. या समाजाच्या राष्ट्रीय प्रमुखांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. मात्र त्यासाठी त्यांनी सलमानसमोर एक अट ठेवली आहे. ही अट कोणती आहे, ते जाणून घेऊयात..

सलमान खानला माफ करू शकतो बिष्णोई समाज; पण ठेवली एक मोठी अट
सलमान खान
Follow us on

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबार झाल्याच्या घटनेला आज महिना झाला. 14 एप्रिल रोजी दोन अज्ञातांनी दुचाकीवरून सलमानच्या घराबाहेर पहाटेच्या वेळी गोळीबार केला होता. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नव्हती. याप्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर पोस्ट लिहित या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. काळवीर शिकार प्रकरणापासूनच बिष्णोई समाजाचा सलमानवर खूप राग आहे. त्याच प्रकरणामुळे लॉरेन्स बिष्णोईकडून सतत सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. बिष्णोई समाज अखेर सलमानला माफ करण्यास तयार झाल्याचं कळतंय. नुकतंच सलमानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अलीने बिष्णोई समाजाकडे सलमानला माफ करण्याची विनंती केली होती.

बिष्णोई समाजाची अट

1998 मध्ये सलमान खान ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीट शिकार प्रकरणात अडकला होता. आता तब्बल 27 वर्षांनंतर अखिल भारतीय बिष्णोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सांगितलं की त्यांचा समाज सलमानला माफ करण्यासाठी तयार आहे. ते म्हणाले, “सोमी अलीने जी माफी मागितली आहे, त्याचं काहीच महत्त्व नाही. अशाप्रकारे तर याआधी अभिनेत्री राखी सावंतनेही माफी मागितली होती. मात्र जो आरोपी आहे, सलमान खान त्याने खुद्द बिष्णोई समाजाची माफी मागितली पाहिजे. ते मंदिरासमोर येऊन माफी मागितल्यास बिष्णोई समाज त्यांना माफ करेल.”

सलमानकडून माफीची अपेक्षा

बुडिया यांनी पुढे म्हटलंय, “आमच्या 29 नियमांपैकी एक नियम हा क्षमादय हृदय आहे. आमचे मोठमोठे महंत, साधू, नेते, बिष्णोई समाजाचे प्रमुख पंच आणि तरुण हे सर्व मिळून विचार करून त्याला माफ करू शकतील. मात्र त्याला मंदिरासमोर येऊन शपथ घ्यावी लागेल की अशी चूक तो पुन्हा कधी करणार नाही आणि नेहमी पर्यावरण तसंच वन्यजीवांचं रक्षण करेल. असं झाल्यास आम्ही त्याला माफ करू शकतो.”

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता महेश ठाकूर याने शूटिंगदरम्यान काय घडलं होतं, त्याचा खुलासा केला होता. “शूटिंगदरम्यान पोलिस सेटवर आले होते आणि त्यांनी सेटवरील सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं होतं. त्यावेळी सेटवरील वातावरण अत्यंत वाईट होतं. मी, मोहनिश बहल आणि करिश्मा कपूर त्या वादात सहभागीसुद्धा नव्हतो. त्यात फक्त पाच जणांचा समावेश होता. नंतर महिलांना पोलिसांनी सोडलं. पण माझ्या मते सलमान भाई रात्रभर पोलिसांसोबत होता. त्यानंतर त्याचे भाऊ अरबाज खान आणि सोहैल खान तिथे आले. दुसऱ्या दिवशी शूटिंगदरम्यान सलमान एकदम ठीक होता”, असं महेश ठाकूरने सांगितलं होतं.