खूप झालं.. आता थकलोय..; गोळीबार प्रकरणात जबाब नोंदवताना काय म्हणाला सलमान?

| Updated on: Jun 13, 2024 | 12:03 PM

एप्रिल महिन्यात गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा जबाब नोंदवला आहे. यावेळी पोलिसांनी दोघा भावंडांना 150 हून अधिक प्रश्न विचारले. सलमानची जवळपास 4 तास चौकशी झाली.

खूप झालं.. आता थकलोय..; गोळीबार प्रकरणात जबाब नोंदवताना काय म्हणाला सलमान?
सलमान खान
Follow us on

मुंबई क्राइम ब्रांचने वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचा जबाब नोंदवला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गँगस्टर्सकडून सतत निशाण्यावर असल्याने सलमानने पोलिसांसमोर जबाब नोंदवताना हताश होऊन निराशा व्यक्त केली. ज्या गुन्ह्यासाठी मी आधीच खूप त्रास सहन केला आणि विविध न्यायालयांमध्ये दंड भरला आहे, असा दावा करत त्यावरून सतत लक्ष्य केल्याप्रकरणी सलमानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात सलमानच्या घराबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरजवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. या शिकार प्रकरणापासून सलमानला सतत बिष्णोई गँगपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

मुंबई क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्यासह चार सदस्यीय टीमने 4 जून रोजी सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या वांद्रे इथल्या घरी गेले होते. यावेळी दोघा भावंडांची सहा तास चौकशी करण्यात आली. या जबाबात सलमानने पोलिसांना सांगितलं की तो गोळीबाराच्या घटनेच्या आदल्या रात्री एका पार्टीनंतर उशिरा घरी पोहोचला होता. पहाटेच्या सुमारास बुलेटच्या आवाजाने त्याला जाग आली. नंतर समजलं की त्याच्याच घराच्या दिशेने हा गोळीबार झाला होता आणि त्यातील एक गोळी बाल्कनीच्या भिंतीला लागली होती. ‘गोळीच्या आवाजाने धक्क्यातून मी जागा झालो आणि बाल्कनीमध्ये तपासण्यासाठी गेलो. बाहेर पाहिलं तर मला कोणीही दिसलं नाही’, असं सलमानने पोलिसांना सांगितलं.

गोळीबाराच्या घटनेवेळी अरबाज त्याच्या जुहूमधल्या घरात होता. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या सलमानला येत असल्याची माहिती असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. यावेळी पोलिसांनी सलमानची तीन तास आणि अरबाजची दोन तास चौकशी केली. पोलिसांनी दोघा भावंडांना 150 हून अधिक प्रश्न विचारले. ज्यावेळी घराबाहेर गोळीबार झाला, तेव्हा सलमानचे वडील सलीम खानसुद्धा घरात उपस्थित होते. मात्र त्यांच्या वयोमानाचा विचार करता त्यांची चौकशी करण्यात आली नाही. मात्र भविष्यात तपासासाठी महत्त्वाचं वाटल्यास त्यांचाही जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमधून अटक करण्यात आली. तर अनुज थापन आणि आणखी एका व्यक्तीला पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी अनुजने पोलीस कोठडीतच आत्महत्या केली.