नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाकडून दु:ख व्यक्त; म्हणाली ‘गेल्या काही वर्षांत..’

| Updated on: Aug 25, 2024 | 11:18 AM

नाग चैतन्यने याआधी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांचे मार्ग वेगळे झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाकडून दु:ख व्यक्त; म्हणाली गेल्या काही वर्षांत..
समंथा रुथ प्रभू, सोभिता धुलिपाला, नाग चैतन्य
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकत्याच एका फॅशन शोमध्ये डिझायनर अनामिका खन्नासाठी रॅम्प वॉक केला होता. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या फॅशन शोमधील तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूर्व पती नाग चैतन्यच्या दुसऱ्या साखरपुड्यानंतर समंथा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात झळकली होती. नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला होता. चार वर्षांच्या संसारानंतर समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले होते. त्यानंतर आता त्याने आयुष्याची पुन्हा एक नवी सुरुवात केली आहे. यावर समंथाने मोकळेपणे कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टची चर्चा होऊ लागली आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रिलेशनशिप, मैत्री आणि प्रेमाचा त्याग या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

समंथाची पोस्ट-

‘मैत्री आणि नातेसंबंध हे परस्परपूरक असतात असं अनेकांना वाटतं आणि त्याच्याशी मी सहमत आहे. तुमच्याकडून प्रयत्न होतात, माझ्याकडूनही ते प्रयत्न होतात. पण गेल्या काही वर्षांत मी एक गोष्ट शिकले की समोरची व्यक्ती तुम्हाला काही देण्याच्या स्थितीत नसली तरी प्रेमापोटी तुम्ही त्या व्यक्तीसाठी सतत प्रयत्न करत असता. तेव्हा ते नातं तुमच्या आणि माझ्या प्रयत्नांच्याही पलीकडे जातं. जोपर्यंत समोरची व्यक्ती पुन्हा तुमच्यासाठी प्रयत्न करण्याच्या स्थितीत येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रयत्न करत राहता. इथपर्यंत ते नातं पोहोचतं. त्यांच्याबाबतीतही हीच गोष्ट असते. प्रेम हा त्याग आहे. जरी ठराविक वेळेसाठी हा देण्याघेण्याच्या समतोल ढासळला तरी. माझ्याकडे मोबदला देण्यासाठी काही शिल्लक नसतानाही ज्या लोकांनी माझ्यावर नि:स्वार्थपणे प्रेमाचा वर्षाव केला, त्यांच्यासाठी मी कृतज्ञ आहे’, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

हे सुद्धा वाचा

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं. 8 ऑगस्ट 2024 रोजी नाग चैतन्य आणि सोभिताने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सोभित आणि नाग चैतन्य हे दोघं लवकरच जल्लोषात लग्न करतील. या दोघांचं लग्न हैदराबादमध्ये होणार आहे. त्यानंतर ते रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.