ते घडायलाच पाहिजे नव्हतं..; नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल समंथा काय म्हणाली?

| Updated on: Jul 16, 2024 | 11:31 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. 2021 मध्ये ती पती नाग चैतन्यपासून विभक्त झाली. त्यानंतर काही महिन्यांनी तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं.

ते घडायलाच पाहिजे नव्हतं..; नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल समंथा काय म्हणाली?
Samantha Ruth Prabhu
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या खासगी आयुष्यात गेल्या तीन वर्षांत बरीच वादळं आली. एकीकडे समंथा तिच्या पतीपासून विभक्त झाली तर दुसरीकडे तिला मायोसिटीस या ऑटो इम्युन आजाराचं निदान झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. गेल्या काही वर्षांत ज्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, त्याविषयी तिने भावना व्यक्त केल्या. समंथाने दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2022 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिला मायोसिटीसचं निदान झालं आणि तिने कामातून ब्रेक घेतला. “माझ्या आयुष्यात मागची तीन वर्षे घडायची नव्हती”, अशी प्रतिक्रिया तिने या मुलाखतीत दिली.

आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का, जी वेगळ्या पद्धतीने व्हायला हवी होती, असा प्रश्न समंथाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “आपल्या सर्वांना आयुष्यातील काही गोष्टी बदलता याव्यात असं वाटतं आणि कधी कधी मला आश्चर्य वाटतं की मी ज्या गोष्टींमधून गेले, त्याची खरंच गरज आहे का? पण आता मागे वळून पाहिलं तर माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. मी काही वेळापूर्वी माझ्या मित्राशी याबद्दल चर्चा करत होते. मला नेहमी असं वाटायचं की माझ्या आयुष्यात गेल्या तीन वर्षांत जे घडलं, जे घडायला पाहिजे नव्हतं. पण आता मला असं वाटतं की आयुष्यात तुमच्यासमोर जी आव्हानं येतील, त्याला सामोरं जावंच लागेल. त्या आव्हानांमधून बाहेर पडता, तेव्हा तुम्ही जिंकलेले असता. आता मला अधिक सक्षम झाल्यासारखं वाटतं. कारण आगीचा सामना करून मी इथपर्यंत पोहोचले. याला अध्यात्मिक प्रबोधन असंही तुम्ही म्हणू शकता.”

हे सुद्धा वाचा

समंथा आणि नाग चैतन्य 2010 पासून एकमेकांना डेट करू लागले होते. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 29 जानेवारी 2017 रोजी दोघांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले होते. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं गेलं. तर समंथा सध्या तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. तिने परदेशातही मायोसिटीसवर उपचार घेतले. 2022 मध्ये ‘खुशी’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथाला या आजाराचं निदान झालं होतं.