बुरखा घातला, इंडस्ट्री सोडली.. आता वर्षभरानंतर अभिनेत्रीने दाखवला मुलाचा चेहरा

| Updated on: Jul 09, 2024 | 12:04 PM

अभिनेत्री सना खानने वर्षभरानंतर मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. सनाने 2020 मध्ये फिल्म इंडस्ट्री सोडली होती. सना खानने अचानक निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला.

बुरखा घातला, इंडस्ट्री सोडली.. आता वर्षभरानंतर अभिनेत्रीने दाखवला मुलाचा चेहरा
सना खान आणि तिचा पती मुफ्त अनस सैय्यद
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस’ आणि काही चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री सना खानने इस्लाम धर्माचं कारण देत इंडस्ट्री सोडली होती. मात्र सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. सनाने 2020 मध्ये ग्लॅमर विश्वाला रामराम केला होता आणि त्यानंतर तिने बिझनेसमन मुफ्ती अनस सैय्यदशी निकाह केला. सनाच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सनाने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला. या मुलाचं नाव तिने तारिक जमील असं ठेवलंय. सनाने आतापर्यंत तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नव्हता. आता जवळपास वर्षभरानंतर तिने तारिकचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला आहे.

सना तिच्या पतीसोबत नेहमी हजला जाते. मात्र यावेळची हज यात्रा तिच्यासाठी खास ठरली होती. कारण यावेळी तिचा एक वर्षाचा मुलगासुद्धा त्यांच्यासोबत होता. हज यात्रेदरम्यान सनाने तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. सनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा हसताना, खेळताना, झोपताना दिसतोय. ‘आमचा छोटा हाजी 2024’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. सनाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नमाज, दुआँ यांच्याशी संबंधित काही मजकूर लिहिला आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे सना खानचा पती?

गुजरातमधील सूरत इथला राहणारा मुफ्ती अनस सय्यद हा एक धार्मिक नेता आणि इस्लामिक विद्वान आहे. सनाची एजाज खानच्या माध्यमातून मुफ्तीशी भेट करून देण्यात आली होती. मुफ्ती अनस हा बिझनेसमनसुद्धा आहे. निकाहनंतर त्याने सनाला एक्सक्लुसिव्ह डायमंड रिंग भेट म्हणून दिली होती. सना खान तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही सतत चर्चेत असते. अनसशी लग्न केल्यानंतरही तिला अत्यंत महागड्या रेस्टॉरंटमध्ये आणि परदेशात विविध ठिकाणी फिरताना पाहिलं गेलंय.

सनाने इंडस्ट्री का सोडली?

“माझ्याकडे नाव, प्रसिद्धी, पैसा हे सगळं होतं. मी काहीही करू शकले असते आणि मला हवं तसं राहू शकले असते. परंतु एक गोष्ट जी हरवली होती, ती म्हणजे मनाची शांती. माझ्याकडे सर्व काही असूनही मी आनंदी का नाही, असा प्रश्न मला पडायचा. मी नैराश्यात गेले होते,” असं तिने सांगितलं होतं.