‘तू तर टोमॅटोची फॅक्ट्री विकत घेऊ शकते तरी..’; सुनील शेट्टीनंतर आता शिल्पा शेट्टी ट्रोलर्सच्या निशाण्यावर

| Updated on: Jul 20, 2023 | 5:31 PM

याआधी सुनील शेट्टीने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. या किंमतीचा परिणाम त्यालाही भोगावा लागत असल्याचं सुनील शेट्टीने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर यामुळे टोमॅटो कमी खात असल्याचं त्याने सांगितलं होतं.

तू तर टोमॅटोची फॅक्ट्री विकत घेऊ शकते तरी..; सुनील शेट्टीनंतर आता शिल्पा शेट्टी ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Shilpa Shetty
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 20 जुलै 2023 : अभिनेता सुनील शेट्टीने काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या वाढत्या दरांविषयी वक्तव्य केलं होतं. त्यावरून नेटकऱ्यांनी इतकं ट्रोल केलं की अखेर त्यांना माफी मागावी लागली. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दलच तिने हा मजेशीर व्हिडीओ शूट केला आहे. मात्र हा व्हिडीओ नेटकऱ्यांना पसंत पडला नाही. आपल्या ‘धडकन’ या चित्रपटातील एका गाण्याच्या पार्श्वभूमीवर शिल्पाने हा व्हिडीओ शूट केला होता. त्यावर सध्या नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.

या व्हिडीओत शिल्पा एका दुकानात टोमॅटोंची खरेदी करताना दिसतेय. टोमॅटो पाहून शिल्पा खुश होते आणि विकत घेऊ लागते, मात्र इतक्यात तिला ‘तुम्हारी हिंमत कैसे हुई, खबरदार जो मुझे छुने की कोशिक की तो’, असा तिच्या ‘धडकन’ या चित्रपटातील डायलॉग ऐकू येतो. ‘टोमॅटोची किंमत माझ्या हृदयाची धडधड वाढवत आहेत’ असं कॅप्शन देत तिने हा गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र शिल्पासारख्या सेलिब्रिटीला टोमॅटोच्या वाढत्या किंमतीची चिंता का वाटावी, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. ‘तू तर टोमॅटोची संपूर्ण फॅक्ट्रीच विकत घेऊ शकतेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुझ्यासारखे सेलिब्रिटी सोन्याचाही टोमॅटो सहज विकत घेऊ शकतील’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

याआधी सुनील शेट्टीने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. या किंमतीचा परिणाम त्यालाही भोगावा लागत असल्याचं सुनील शेट्टीने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर यामुळे टोमॅटो कमी खात असल्याचं त्याने सांगितलं होतं. सुनील शेट्टीचं हेच वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांनीही सुनील शेट्टीच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व वादानंतर सुनील शेट्टीने अखेर शेतकऱ्यांची माफी मागितली.

“मी खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचं समर्थन करतो. त्यांच्याबद्दल नकारात्मक धारणा बाळगण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी नेहमीच त्यांच्या पाठिंब्याने काम केलं आहे. मला आपल्या देशी उत्पादनांचा प्रचार करायचा आहे. आपल्या शेतकऱ्यांना त्याचा नेहमीच फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे. शेतकरी हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. माझे हॉटेल्स असल्याने नेहमीच त्यांच्याशी माझा थेट संबंध राहिलेला आहे. माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचा विचार मी माझ्या स्वप्नातही विचार करू शकत नाही”, असं सुनील शेट्टीने स्पष्ट केलं.