“तुम्ही जिवंतच नसाल तर…”; हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं चाहत्यांना आवाहन

| Updated on: Jan 03, 2024 | 3:07 PM

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर घरी परतल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याला उपचारासाठी तातडीने अंधेरी इथल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल केलं असता रात्री 10 च्या सुमारास श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. सहा दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज मिळाला होता.

तुम्ही जिवंतच नसाल तर...; हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं चाहत्यांना आवाहन
Shreyas Talpade
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 3 जानेवारी 2024 | गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता श्रेयस तळपदेला कार्डिॲक अरेस्टनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्रेयसच्या दोन्ही धमन्या ब्लॉक झाल्या होत्या. त्यापैकी एक 100 टक्के तर दुसरी 99 टक्के ब्लॉक झाली होती. त्यामुळे कार्डिॲक अरेस्टनंतर अँजियोप्लास्टीद्वारे स्टेंट बसवण्यात आले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयस त्या सर्व अनुभवाविषयी आणि आरोग्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आपण आपल्या आरोग्याला गृहित धरतो, पण जान है तो जहान है, असं म्हणत त्याने चाहत्यांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हणाला श्रेयस?

“मी शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की मी त्यांच्याकडे पाहून हसलो आणि पत्नीची माफी मागितली. त्यानंतर पाच दिवस मला अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात आलं होतं. सध्या मी पुरेसा आराम करतोय. सहा आठवड्यांनंतर मी कामावर जाऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले आहेत. पण मला माझ्या कुटुंबीयांसोबत, पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवायचा आहे. काही चित्रपट बघायचे आहेत आणि पुस्तकं वाचायची आहेत. जेव्हा असं काही घडतं, तेव्हा सर्वाधिक त्रास तुमच्या कुटुंबीयांनाच होतो. 1982 मध्ये ‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर जेव्हा अमिताभ बच्चन यांचा गंभीर अपघात झाला, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांनी काय अनुभवलं असेल, याची मी आता कल्पना करू शकतो. बिग बींनीसुद्धा नंतर त्यांच्या एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की, तेसुद्धा काही मिनिटांपर्यंत क्लिनिकली मृतावस्थेत होते”, असं श्रेयस म्हणाला.

जान है तो जहान है

“मी माझ्या आयुष्यात याआधी कधीच रुग्णालयात दाखल झालो नव्हतो. कधी मला फ्रॅक्चरसुद्धा झाला होता. त्यामुळे असं काही घडेल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुमच्या आरोग्याला तुम्ही गृहित धरू नका. वेळ ही खूप अनिश्चित असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जर आरोग्यच ठीक नसेल, तर बाकी कोणत्याच गोष्टींचा अर्थ नाही. जान है तो जहान है. अशा प्रकारच्या अनुभवामुळे तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. मी वयाच्या 16 व्या वर्षापासून नाटकात काम करायला सुरुवात केली होती. वयाच्या विसाव्या वर्षी मी प्रोफेशनल अभिनेता बनलो. गेल्या 28 वर्षांपासून मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होतो. आपण आपल्या कुटुंबीयांनाही गृहित धरतो. आपल्याकडे वेळ आहे असा विचार करतो. माझ्या पालकांनाही मी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना पाहिलंय. आपण जगण्यासाठी खूप मेहनत घेतो पण हे सर्व तितकं महत्त्वाचं आहे का? जर तुम्ही जिवंतच नसाल तर मग या सगळ्यांचा काय अर्थ आहे”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

हे सुद्धा वाचा

“मी प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं. त्या सिग्नलकडे कृपया लक्ष द्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याविषयी तुमच्या डॉक्टरांना सांगा. काहीजण डॉक्टरांकडे जाणं टाळतात. ते एखादी टेस्ट करायला सांगतील, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. पण हे टेस्ट किती उपयोगी ठरू शकतात, हे तुम्हालाही माहीत नसतं. याबद्दल पुरावे तर नाहीत, पण मी असं अनेकदा ऐकलंय की कोविडनंतर अनेक निरोगी व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. 2020 मध्ये मलाही कोविडची लागण झाली होती. मी धुम्रपान करत नाही, मद्यपान महिन्यात क्वचित कधीतरी करतो, हेल्थी डाएट फॉलो करतो, व्यायाम करतो. पण माझं शरीर मला जे सिग्नल देत होतं, त्याकडे मी दुर्लक्ष केलं”, असं श्रेयस पुढे म्हणाला.