घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर..; सिद्धार्थ चांदेकरचा विचार करायला भाग पाडणारा व्हिडीओ

| Updated on: Aug 16, 2024 | 11:11 AM

स्वातंत्र्यदिनी अभिनेते सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडीओ पोस्ट करत मार्मिक संदेश दिला आहे. मुलींवर अंकुश ठेवण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा काय करतोय, कुठे जातोय, त्याची संगत कशी आहे हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं असल्याचं तो म्हणाला.

घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर..; सिद्धार्थ चांदेकरचा विचार करायला भाग पाडणारा व्हिडीओ
कोलकाता डॉक्टर केसवर सिद्धार्थ चांदेकरचा व्हिडीओ
Image Credit source: Instagram
Follow us on

कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. याप्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या भीषण घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या अमानवी कृत्याने डॉक्टर आणि महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण असल्याची भावना व्यक्त होतेय. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या घटनेविषयी संताप व्यक्त केला. अशातच स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडीओ पोस्ट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘सॉरी भारतमाते, तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही. हा स्वातंत्र्यदिन तुझ्यासाठी हॅपी नाही. क्षमा,’ असं कॅप्शन देत सिद्धार्थने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाला सिद्धार्थ?

“मला वाटतं ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे आपण नको बोलायला आता. मुलगी शिकतेय, तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय, तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये. आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परय येतेय की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर कुठे जातो, काय करतो, काय संगत आहे त्याची, कोणाशी बोलतोय, काय विचार आहेत त्याचे.. हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरंच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली,” असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“या देशातल्या मुलाचे विचार बदलले आणि त्याच्या अक्षम्य चुकांना पाठिशी घालणाऱ्या त्याच्या आईवडिलांचे, त्याच्या मित्रांचे, नातेवाईकांचे विचार बदलले तरच ती भारत माता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. नाहीतर स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनंतरसुद्धा ती दहशतीतच जगतेय. विचार करुयात,” असं त्याने व्हिडीओच्या अखेरीस म्हटलंय.

बलात्कार किंवा विनयभंगच्या घटना घडल्या की अनेकदा मुलींना, महिलांना दोष दिला जातो. त्यांच्या कपड्यांच्या निवडीवर, वागण्यावर प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र मुलांना खरे संस्कार शिकवायची गरज असल्याचं सिद्धार्थने या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलंय. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ असं म्हणण्यापेक्षा आता बेटा पढाओ, बेटी बचाओ असं म्हणायला हवं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘असे विचार सर्व पुरुषांचे होतील तेव्हा खरं देशाला स्वातंत्र्य मिळेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘माफ करा सर, पण हे विचार समजून घेण्याएवढी माणुसकी आणि बुद्धीही उरली नाही’, असंही एका युजरने लिहिलं आहे.