झहीरसोबतच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले? अखेर सोनाक्षीकडून खुलासा

| Updated on: Sep 14, 2024 | 8:33 AM

सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी 23 जून रोजी लग्न केलं. या लग्नाला तिचा सख्खा भाऊ लव सिन्हा उपस्थित नव्हता. सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत तिच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं गेलं होतं.

झहीरसोबतच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले? अखेर सोनाक्षीकडून खुलासा
शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या आंतरधर्मीय लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. यावर्षी जून महिन्यात सोनाक्षी आणि झहीरने लग्न केलं होतं. या लग्नाबद्दल सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव-कुश सिन्हा फारसे खुश नव्हते, अशी त्यावेळी चर्चा होती. सोनाक्षीचा एक भाऊ तिच्या लग्नालाही उपस्थित नव्हता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द सोनाक्षीने तिच्या लग्नाबाबत आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा केला आहे. ‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली की तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना झहीरसोबतच्या नात्याबद्दलची आधीपासूनच माहिती होती.

याविषयी सोनाक्षी पुढे म्हणाली, “माझे वडील खूप खुश होते. ते म्हणाले, जब मियाँ बिवी राझी तो क्या करेगा काझी? ते झहीरला आधीही भेटले होते. त्यांना झहीर खूप आवडतो. दोघांचा वाढदिवससुद्धा एकाच महिन्यात आहे. माझ्या वडिलांचा वाढदिवस 9 डिसेंबरला आणि झहीरचा वाढदिवस 10 डिसेंबरला असतो. त्यामुळे दोघंही तसे सारखेच आहेत.” या मुलाखतीत झहीर त्याच्या लग्नाविषयी म्हणाला, “खरंतर मी त्यांच्या आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या प्रेमात आहे. त्यांच्या बोलण्यातूनच त्यांच्याकडे असलेलं ज्ञान दिसून येतं. त्यांच्यासोबत तुम्ही एक किंवा दोन तास बोलत बसलात तर तुम्हाला एखाद्या विद्यापिठात बसल्यासारखं वाटेल.”

हे सुद्धा वाचा

यानंतर सोनाक्षीने तिच्या आईचीही प्रतिक्रिया सांगितली. “माझी आई झहीरला आधीपासून ओळखते. किंबहुना आमच्या नात्याविषयी सर्वांत आधी मी तिलाच सांगितलं होतं. माझ्या आईवडिलांनीही लव्ह मॅरेज केलंय, त्यामुळे त्यांना याबाबत पुरेशी कल्पना होती”, असं तिने पुढे सांगितलं. सोनाक्षी आणि झहीरने जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 23 जून रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. मुंबईतील सोनाक्षीच्या घरीच मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतल्या मित्रमैत्रिणींसाठी त्यांनी जंगी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.

एका मुलाखतीत सोनाक्षी तिच्या सासरच्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नानंतर तिच्यावर जेवण बनवण्याचा आणि घरातील इतर कामं करण्याचा दबाव टाकला जातोय का, या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीने या मुलाखतीत दिलं होतं. ती म्हणाली, “हल्ली लग्नानंतर महिलांवर जेवण बनवण्याचा दबाव नाही, कारण प्रत्येकाला माहितीये की आता महिलांना बाहेर जाऊन कामसुद्धा करावं लागतं आणि घरसुद्धा सांभाळावं लागतं. हा प्रत्येकाच्या इच्छेचा विषय आहे. मी खरंच नशीबवान आहे की माझ्या सासरच्यांकडून असा काही दबाव नाही. जरी मी पुढाकार घेऊन जेवण बनवलं तरी ते माझ्या इच्छेनुसारच असतं. त्यात कोणाचाही दबाव नसतो.”