सात वर्षांपर्यंत नातं का लपवलं होतं? सोनाक्षीचं उत्तर ऐकून पती झहीरला हसू अनावर

| Updated on: Sep 29, 2024 | 12:30 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी प्रियकर झहीर इक्बालशी लग्न केलं. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी नोंदणी पद्धतीने हे लग्न केलं. या लग्नावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

सात वर्षांपर्यंत नातं का लपवलं होतं? सोनाक्षीचं उत्तर ऐकून पती झहीरला हसू अनावर
सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल
Follow us on

यावर्षी जून महिन्यात लग्नाची घोषणा करत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने नोंदणी पद्धतीने लग्न केलं. या दोघांचं आंतरधर्मीय लग्न सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत होतं. सोनाक्षी आणि झहीरने त्यांचं रिलेशनशिप माध्यमांपासून लपवलं होतं. हे दोघं त्यांच्या डेटिंग लाइफविषयी कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नव्हते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने यामागचं कारण सांगितलं आहे.

‘सीएनएन न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, “लग्नाआधी आम्ही सात वर्षे एकमेकांना डेट करत होतो. आम्ही म्हणालो, हे जग खड्ड्यात जाऊ दे, पण आपण आपलं प्रेम साजरं करुयात. त्यामुळे ज्यादिवशी आम्ही लग्न केलं, तेव्हा फक्त प्रेमच प्रेम होतं. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आमच्या आजूबाजूला आम्हाला फक्त अशीच लोक हवी होतं, ज्यांना आमची खरीच काळजी आहे किंवा जे खरंच आमच्यावर प्रेम करतात. आम्हाला फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा हवी होती. म्हणूनच आम्ही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.”

हे सुद्धा वाचा

सात वर्षे डेट करताना नात्याविषयी कधी जाहीरपणे का व्यक्त झाले नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर ती पुढे म्हणाली, “त्याला ‘नजर’ कारणीभूत होतं.” सोनाक्षीचं हे उत्तर ऐकून तिचा पती झहीर हसतो आणि म्हणतो, “मीसुद्धा हेच उत्तर देणार होतो.” तेव्हा सोनाक्षी पुढे स्पष्ट करून सांगते, “एक अभिनेत्री म्हणून तुमच्याकडे खूप लोकांचं लक्ष असतं. तुम्हाला जे काम करायचं आहे, जे स्वप्न साकारायचं आहे, त्यापासून लक्ष विचलित करणाऱ्या बऱ्याच घटना असतात. त्यामुळे खासगी गोष्टी या खासगीतच राहाव्यात असं मला वाटत होतं. कारण ते फक्त तुमच्यापुरतंच मर्यादित असतं. तसंही अभिनेत्री म्हणून तुम्ही प्रकाशझोतात असतातच आणि प्रत्येकाला तुमच्याविषयीची प्रत्येक गोष्ट माहीत असते. त्यामुळे जी गोष्ट तुमच्या खूप जवळची आहे, प्रिय आहे ती खासगी ठेवावी असं मला वाटलं. यामुळेच मी डेटिंगबद्दल कधी व्यक्त झाले नाही. यामागे काहीच प्लॅनिंग नव्हती. पण नैसर्गिकरित्या ते घडत गेलं.”

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी लग्न केलं. सोनाक्षीच्या मुंबईतल्याच घरी हे लग्न पार पडलं होतं. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘द बास्टियन’ या हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.