‘वीर मुरारबाजी’मध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

| Updated on: Aug 28, 2024 | 11:49 AM

'वीर मुरारबाजी' या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

वीर मुरारबाजीमध्ये हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
Sourabh Raaj Jain
Image Credit source: Instagram
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा आता चित्रपटाच्या माधम्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ असं या चित्रपटाचं नाव असून हा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, यावरून पडदा उचलण्यात आला आहे.

मालिका विश्वात ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ यांची तसंच ‘ओम नमो व्यंकटेशाय’ या दाक्षिणात्य चित्रपटात ‘तिरुपती बालाजी’ यांची भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारा अभिनेता सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याचं विलोभनीय पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स आणि ए. ए. फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

हे सुद्धा वाचा

“सगळ्या देवतांच्या भूमिका तसंच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारायला मिळणं हे मी भाग्यचं समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेला ही प्रेक्षकांचं हेच प्रेम मिळेल,” अशी आशा सौरभ राज जैनने व्यक्त केली.

1665 च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचं निर्माते अजय आरेकर यांनी सांगितलं. “अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असंही ते म्हणाले.